Crime News : एका कौटुंबिक वादाचे रूपांतर इतक्या भयानक हत्याकांडात होईल, याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. घरातील किरकोळ कुरबुरींवरून सुरू झालेला वाद अचानक हिंसक वळणावर गेला आणि सासरच्या मंडळींनी मिळून आपल्या जावयाची लाठीकाठीने बेदम मारहाण करून हत्या केली. जितेंद्र पंडित असे मृत जावयाचे नाव असून, त्याच्या मृत्यूचा पुरावा पूर्णपणे नष्ट करण्याच्या उद्देशाने सासरच्या लोकांनी एक खळबळजनक कट रचला. त्यांनी घराच्या मागील भागात तीन फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये जितेंद्रचा मृतदेह दफन केला. विशेष म्हणजे, मृतदेह लवकर सडून जावा आणि दुर्गंधी पसरून कोणाला संशय येऊ नये, यासाठी त्यांनी त्या खड्ड्यात तब्बल 15 पाकिटे मीठ टाकले होते, ज्यावरून या हत्येचे नियोजन किती क्रूर होते हे स्पष्ट होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : चुलत बहीण सतत 'तो' सल्ला द्यायची, भावाच्या डोक्यात तिडीक गेली, भयंकर प्रकरण!
आरोपींच्या अटकेने उघडकीस आले सत्य; पोलिसांनी पुरलेली बॉडी उकरली
बुधवारी रात्री ही घटना घडल्यानंतर सासरच्या मंडळींनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांना या गुप्त हत्येची कुणकुण लागली. शुक्रवारी मोहनपूर पोलिसांनी काला गावात धाव घेतली आणि संशयास्पद जागेची पाहणी केली असता तिथे मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी खोदकाम करून जितेंद्रचा मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी जमुई सदर रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मृतक जितेंद्रची पत्नी रजनी, त्याची सासू, मेहुणी आणि मेहुणा यांना तातडीने ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत या चौघांनीही जितेंद्रच्या हत्येची कबुली दिली असून, पोलीस आता हत्येच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करत आहेत.
हेही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल
10 वर्षांचा संसार पण अनैतिक संबंधामुळे भयंकर शेवट
मृतक जितेंद्र पंडित हा मूळचा झारखंडमधील मधुपूरचा रहिवासी होता आणि गेल्या 10 वर्षांपासून तो सासरीच वास्तव्यास होता. जितेंद्र आणि रजनी यांना दोन लहान मुले असून, एका पाच वर्षांच्या मुलीच्या आणि दोन वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरून आता पितृछत्र हरपले आहे, तर आई आता जेलच्या कोठडीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्रला दारूचे व्यसन होते आणि घरची आर्थिक स्थिती बेताची होती. काही ग्रामस्थांच्या मते, जितेंद्रचे आपल्या मेहुनीशी अनैतिक संबंध होते, ज्यामुळे कुटुंबात सतत तणाव असायचा, तर पत्नी रजनीचा असा आरोप आहे की तो दारूच्या नशेत रोज तिला मारहाण करायचा. या वादातूनच हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याचे समजते.
अवैध संबंध आणि सासूवर केलेल्या हल्ल्यामुळे सासरची मंडळी जितेंद्रच्या विरोधात गेली होती. पोलीस उपाधीक्षक सतीश सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रने आपल्या सासूची बोटं दाताने चावून कापली होती, ज्यानंतर रागाच्या भरात सासरच्यांनी हे कृत्य केले. जितेंद्रचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास आणि त्याचे दोनदा झालेली तुरुंगवारी यामुळे तो कुटुंबासाठी डोकेदुखी ठरला होता. सध्या फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत असून शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काला गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT











