ADVERTISEMENT
Kishor Patil, Jalgaon : "महायुती सरकारच्या वर्षभरात एक कवडीही मिळाली नाही. आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सहारा आहे. अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील विकासाची भर वर्षभरात काढू शकत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून जास्तीचा निधी आमच्या मतदारसंघाला द्यावा", असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील म्हणाले. पाचोरा येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर आगपाखड केली.
किशोर पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे इतका सत्यनाश झाला. मात्र आता शासनाकडून काय अपेक्षा करावी. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक रुपयात पिक विमा ही योजना राबवली होती. जर एक रुपयाचा पिक विमा यावर्षी चालू राहिला असता तर शासनाकडे हात पसरवण्याची गरज शेतकरी बांधवांना आली नसती. तुम्ही एक रुपयाचा पिक विमाही बंद केला आणि आज शेतकरी हवालदील झाला.
हेही वाचा : नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी काळजी करणारी पोस्ट, 6 शब्दात काय म्हणाले?
पुढे बोलताना किशोर पाटील म्हणाले, भाजपमध्ये बंडखोरी केली तर पाच वर्ष हकालपट्टी होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरच्या सभेत म्हटले. मात्र विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली. त्यावेळेस मी त्यांना फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई न करता पदाच्या रूपाने त्यांना तुम्ही शाबासकी देत आहात. जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते सांगत आहेत की आपण युती करू. मात्र हे कधी पलटी खातील त्याचा भरोसा नाही. शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार असं म्हणत किशोर पाटलांनी यावेळी दंडही थोपटले. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांच्या भाजपवरील टीकेनंतर महायुतीतील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
आज काय चालले ते माहित नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एक दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखं काम केलं. प्रत्येक भगिनीला जर तुम्ही विचारलं तर तुझा लाडका भाऊ कोण तर सख्ख्या भावाच्या आधी लाडकी भगिनी सांगते की. माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहेत. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचा मानधन एकनाथ शिंदे यांनी सुरू केले. दीड हजार रुपयांची किंमत ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं मी जर पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लाडक्या बहिणींचं 1500 रुपयांचे मानधन 2100 रुपये करणार आहे. पण दुर्दैवाने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, अशी खदखदही किशोर पाटील यांनी बोलून दाखवली.
शरद पवार असो व अजित पवार असो हे कधी कोणावर गुगली टाकतील हे महाराष्ट्राला अजून पण कळलेलं नाही. मात्र, माजी आमदार दिलीप वाघ या दोघा पवारांना उल्लू बनवून भाजपात गेले. दिलीप वाघ हे कोणत्या पवारांकडे होते हे आजपर्यंत आम्हाला समजलं नाही, असंही किशोर पाटील यावेळी म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











