
'दया दरवाजा तोड दो' असं म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो सीआयडी सिरीयलमधला दया. दोन वर्षांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर दयासह संपूर्ण सीआयडीच्या टीमला सर्वांनी मिस केलं. मात्र दयाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच दया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
अभिनेता दया सावधान इंडियाच्या माध्यमातून पुन्हा छोट्या पडद्यावर येणार आहे. दया सावधान इंडिया या सिरीयलमध्ये सूत्रसंचालन करणार आहे. गेल्या काही काळापासून सावधान इंडिया या सिरीलयमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता या सिरीयलचं सूत्रसंचालन दयानंद शेट्टी करणार असल्याचं ठरलंय.
दरम्यान दयाने स्वतः यासंबंधी माहिती दिली आहे. एका माध्यमाशी बोलताना दया म्हणाला, "हो. मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एखाद्या सिरीयलचं सूत्रसंचालन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. एक सूत्रसंचालक म्हणून सावधन इंडिया या सिरीयलमध्ये काम करताना मला आनंद होत होतोय."
दरम्यान दयानंद शेट्टी सीआयडी या सिरीयलच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला होता. सीआयडी ही सिरीयल फार लोकप्रिय ठरली होती. यामधील एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत तसंच डॉक्टर साळुंखे ही सर्व पात्र घराघरात पोहोचली होती. त्यानंतर 2018 मध्ये ही मालिका बंद करण्यात आली.