
भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) टीकास्त्र डागलं. राज्यात हुकुमशाही आलीये का? असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली असल्याचं ते पुण्यात (Pune) झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजता घडली. खार पोलीस ठाण्याच्या जवळच ही घडली. या प्रकारानंतर चंद्रकांत पाटील यांनी लागलीच पत्रकार परिषद घेतली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
पाटील म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली असून भाजप त्याबद्दल चिंता व्यक्त करते तसेच निषेध करते.'
चंद्रकांत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला. त्या आधी भाजपच्या मुंबईतील पोलखोल यात्रेच्या रथाची मोडतोड करण्यात आली व हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळले."
"अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास निघाले तर त्यांच्या मुंबईतील घराबाहेर जमाव जमवून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. एखाद्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर शिवसैनिक घरात घुसून दमबाजी करतात. राज्यात हुकुमशाही आली का, आणीबाणी लागू झाली का, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली आहे," अशा शब्दा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला.
"हनुमान चालिसा म्हणण्यात विरोध करण्यासारखे काय आहे? एखादी व्यक्ती आपल्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास येत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला मानानं घरात बोलावावं. तसं नको असेल तर रोखण्यासाठी पोलिसांना बोलवावं. परंतु सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरविणे आणि त्यांनी हिंसक विरोध करणे हे अनाकलनीय आहे. मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात पोलीस कमी पडले का, त्यांना राज्य चालविता येत नाही का, असे प्रश्न यातून निर्माण होतात," असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
"कमिशनसाठी कृत्रिम वीजटंचाई"
"वीज खरेदीत कमिशन मिळावे, यासाठी राज्यात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून लोडशेडिंग केले जात आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असून शेतकरी ते पिकांना देऊ शकत नाहीत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार होते त्यावेळी पाच वर्षे राज्यात लोडशेडिंग बंद होते. आता पुन्हा कमिशनसाठी लोडशेडिंगचं कृत्रिम संकट आणले आहे. भाजप हे सहन करणार नाही. याच्या विरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन करत आहोत," असा इशारा पाटील यांनी दिला.