
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (17 जून) सकाळीच राजभवन (Raj Bhavan) येथे जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी अचानक राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेच का घेतली असावी याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यापालांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आणि शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन मतभेद असल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेकदा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर टीका देखील केली. मात्र, आज राज्यपालांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मधल्या काळात या दोन्ही नेत्यांमधील जो दुरावा निर्माण झाला होता. तो कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आतापर्यंत कशाकशावरुन झाले आहेत वाद?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन सभागृहांपैकी एका ठिकाणी सहा महिन्यांच्या आत निवडून येणं हे संविधानिकदृष्ट्या अनिवार्य होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती रखडवली होती. त्यावरुन राज्यपालांवर बरीच टीका देखील झाली होती.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील दुसरा आणि दीर्घ काळ सुरु असलेला वाद म्हणजे ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल कोट्यातील विधानपरिषदेतील बारा आमदारांची नियुक्ती. जी अद्यापही झालेली नाही.
याविषयी एक RTI देखील दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये 12 आमदारांच्या नावाची यादी ही राज्यपालांकडेच असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरुन राज्यपालांवर सातत्याने टीकास्त्र सोडलं जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नोव्हेंबर महिन्यातच प्रत्येकी चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र अद्यापही राज्यपालांनी यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये आणखी एका मुद्द्यावरुन वाद रंगला असल्याचं पाहायला मिळालं होतं. कोरोनामुळे राज्यसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्ये काही गोष्टी काही प्रमाणात अटी शर्थींसह सुरू झाल्या.
त्यानंतर भाजपने ठाकरे सरकार मंदिरं का उघडत नाही? असा प्रश्न विचारत आंदोलन केलं होतं. त्यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण केली होती. ज्याला मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं होतं.
मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती राज्यपालांची भेट
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 11 मे रोजी राज्यपालांची भेट घेतली होती.
या भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले होते की, 'जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला त्यानुसार हे स्पष्ट झालं आहे की केंद्र सरकारला आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याची मुभा आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्राचं म्हणणं केंद्रापर्यंत पोहचवा अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली.'
'राज्यपालांनी आमची विनंती मान्य केली आहे. लवकरच आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. पंतप्रधानांनाही यासंदर्भातली विनंती करणार आहोत.'