
महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोना रूग्णांची संख्या ४ हजारांच्याही पुढे गेली आहे. ओमिक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरिएंटमुळे कोरोना रूग्ण वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात तीन कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुरूवारी राज्यात ४ हजार २५५ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी राज्यात ४ हजार २४ रूग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवस सलग राज्यात ४ हजारांच्यावर रूग्ण वाढले आहेत. दिवसभरात राज्यात २ हजार ८७९ कोरोना रूग्णांनी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना मुक्त रूग्णांची संख्या ७७ लाख ५५ हजार १८३ इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८७ एवढं झालं आहे. सक्रिय रूग्ण २० हजारांच्यावर गेले आहेत.
राज्यातील सक्रिय रूग्णांमध्ये ७० टक्के रूग्ण आहेत. मुंबईत सध्या १७ हजार ५ सक्रिय रूग्ण आहेत. तसंच ठाण्यात ३ हजार ९७८ तर पुण्यात १४५३ सक्रिय रूग्ण आहेत.
महाराष्ट्रात आज ४ हजार २५५ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज २३६६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात ३७४, नवी मुंबईत ३८३, वसई मध्ये १२२ त पुण्यात १९४ कोरोना रूग्ण आढळले आहेत.
राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?
राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होते आहे. ही रूग्णवाढ ठराविक जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हायरसचे व्हेरिएंटचे आढळून येत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या मर्यादित जिल्ह्यात रूग्ण वाढत आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ४० टक्क्यांवर गेला आहे. आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.
राज्यात रूग्णवाढ होत असली तरीही रूग्णालयात दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच आहे असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला असून हर घर दस्तक या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत. राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटामुळे मुलांचं लसीकरण झालं नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालक आणि शिक्षकांना देण्यात येत आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.