
महाराष्ट्रात आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या ८ कोटी ११ लाख, १२ हजार ९५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ९६ हजार ११४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ हजार ४३२ सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात एक ३१ वर्षीय रूग्ण B A 5 व्हेरिएंट असलेला आढळला आहे. ही महिला असून होम आयसोलेशनमध्ये आहे.
मुंबईत १२४२ रूग्ण
मुंबईत मंगळवारी दिवसभरात १,२४२ रूग्णांची नोंद झाली. राज्यात आढळून आलेल्या १,८८१ रूग्णांपैकी १,२४२ रूग्ण फक्त मुंबईत आढळले आहेत. राज्यात आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोना रूग्ण वाढत असले तरीही काळजीचं कारण नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच काळजी घेण्याचं आणि मास्क वापरण्याचंही आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. राज्यात कोरोनाचे ८ हजार ४३२ रूग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी सर्वाधिक सक्रिय रूग्ण म्हणजेच ५ हजार ९७४ रूग्ण मुंबईत आहेत.
देशात गेल्या २४ तासांत ३७१४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २६ हजार ९७६ वर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात २५१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आदल्या दिवशी ४ हजार ५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे.
मागच्या सात दिवसात राज्यातील कोव्हिड रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. यातल्या ९५ टक्के रूग्णांना लक्षणं नाहीत. साधारण ४ टक्के रूग्णांना लक्षणं आहेत आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर १.४ टक्के रूग्ण गंभीर आहेत.
महाराष्ट्रात रूग्ण वाढू लागल्याने तीन दिवसांपूर्वीच सरकारने सगळ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. मास्क सक्ती नाही मात्र वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन लोकांनी मास्क लावावा असं आवाहन करण्यात आलं आहे.