१५ दिवसांत ७०० चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावरून 'डिलिट'; यशस्वी यादवांची धक्कादायक माहिती
महाराष्ट्रात ठिकठिकाणी लाऊडस्पीकर किंवा भोंग्यांवरून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केली जाण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी आता यासंदर्भात एक आकडेवारी दिली आहे.
काय म्हटलं आहे यशस्वी यादव यांनी?
गेल्या काही दिवसांपासून धार्मिक वातावरण तापवणाऱ्या अनेक पोस्ट टाकण्यास सुरूवात झाली आहे. त्यातल्या अनेक पोस्ट या चिथावणीखोर आहेत. ज्या हटवण्यास आम्ही सुरूवात केली आहे.

या सगळ्या धर्माशी संबंधित पोस्ट आहेत. मागच्या १५ दिवसात ७०० पोस्ट सायबर सेलला डिलिट कराव्या लागल्या आहेत. धार्मिक भावना भडकवणाऱ्या, चिथावणीखोर म्हणता येतील अशा या पोस्ट होत्या त्यामुळे आम्ही त्या डिलिट केल्या असंही यशस्वी यादव यांनी म्हटलं आहे.या पोस्ट जातीयवादी किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या आहेत.
अशा प्रकारे पोस्ट लिहिणाऱ्यांवर लोकांवर दोन प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. सर्वात आधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ववरून या पोस्ट उतरवण्यासंदर्भात आणि प्रोफाईल्स संदर्भात नोडल अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. त्यासोबतच त्या प्रोफाईलची सर्व माहिती मागितल्यानंतर संबंधित सायबर युनिटला त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र दिलं आहे.
या प्रकारे आम्ही मागच्या १५ दिवसांमध्ये ७०० हून अधिक पोस्ट डिलिट केल्या आहेत. एवढंच नाही तर अशा लोकांच्या प्रोफाईल्सही आम्ही डिलिट केल्या आहेत. आम्हाला आणखी एक मार्ग सापडला आहे तो असा की आम्ही चिथावणीखोर पोस्ट लिहिणाऱ्यांच्या इनबॉक्समध्ये १४९ CRPC ची नोटीस पाठवतो ही नोटीस पाहिल्यानंतर संबंधित पोस्ट लिहिणारा माणूस आपली चिथावणीखोर पोस्ट स्वतःच हटवतो. यावर्षी आम्ही ४०० जणांना अशा नोटीस पाठवल्या आहेत असंही यशस्वी यादव यांनी स्पष्ट केलं.