सर्वात खडतर प्रवास! पैसे नसल्यामुळे अँब्युलन्स नाकारली, मुलाचा मृतदेह वडील बाईकवरुन घेऊन गेले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– मोहम्मद हुसेन खान, पालघर प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणांनी केलेल्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. परंतू आदिवासीबहुल भागांमध्ये आजही नागरिकांना साध्या-साध्या सोयी-सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे घडली आहे. सहा वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर केवळ पैसे नसल्यामुळे मुलाच्या वडीलांना हॉस्पिटल प्रशासनाने अँब्युलन्स नाकारली. यानंतर पीडित मुलांच्या वडिलांनी आपल्या मुलाचा मृतदेह बाईकवर ठेवत ३० किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे.

दरम्यान ही बाब समोर आल्यानंतर रुग्णालयाच्या सिव्हील सर्जननी, घडलेल्या दिवशी रुग्णवाहिकेवर असलेल्या तीन चालकांचं निलंबन केलं आहे. हे तिन्ही चालक खासगी एंजन्सीद्वारे नियुक्त करण्यात आल्याची माहिती कळतेय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, जव्हार येथील पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी (वय ६) ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर आई-वडिलांनी उपचारासाठी अजयला त्र्यंबकेश्वर येथील दवाखान्यात दाखल केलं. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर अजयच्या आई-वडिलांनी त्याला मोखाडा येथील ग्रामीण रुग्णलयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु तेथील डॉक्टरांनी अजयला दाखल करुन न घेता जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असं सांगितले. या धावपळीनंतर अजयच्या आई-वडिलांनी त्याला लगेचच जव्हार कुटीर रुग्णलयात दाखल केलं. या उपचारादरम्यान २५ जानेवारीला रात्री ९ वाजता अजयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोटच्या गोळ्याचं निधन झाल्याचं कळताच पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतू इथे त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत. अजयच्या वडीलांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णावाहिकेसाठी विचारणा केली असता, पैसे असतील तरच रुग्णवाहिका मिळेल असं उत्तर हॉस्पिटल प्रशासनाने दिल्याचं अजयचे वडील युवराज पारधी यांनी सांगितलं. आर्थिक चणचण असल्यामुळे अजयच्या वडीलांनी अखेरीस आपल्या मुलाला एका चादरीत गुंडाळून बाईकवर बसवलं.

ADVERTISEMENT

रात्री कडाक्याच्या थंडीत आपल्या मुलाचा अखेरचा प्रवास सरकारी अनास्थेमुळे युवराज पारधी यांना थंडीत कुडकुडत बाईकवरुन करावा लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतो आहे. एकीकडे राज्यकर्ते डिजीटल इंडियाचं स्वप्न दाखवत असताना पालघरसारख्या भागात अजुनही आरोग्य विभागाच्या ढिसाळ कामामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे चीड व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT