
मुंबई: 'जर हनुमान चालीसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की, ते आम्ही रोज म्हणू. आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा लावा.. मी आता या ठिकाणी म्हणतो.. 'जय हनुमान जय हनुमान ज्ञान गुन सागर... पूर्ण म्हणून दाखवतो..' असं म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालीसाचे काही ओळीच म्हणून दाखवल्या. 'तसंच यापुढेही आम्ही सगळे हनुमान चालीसा म्हणत राहू हिंमत असेल तर दाखल करा राजद्रोहाचा गुन्हा.' असं आव्हानही त्यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
'या महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणण्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्याकरिता तयार आहे. पण या ठिकाणी ज्याप्रकारे हे सरकार वागतंय हे महाराष्ट्राला अत्यंत लज्जा आणणारं आहे.' अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडली, सरकारला दिलं थेट आव्हान
'आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. मात्र, ज्या काही घटना गेले चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या पाहिल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही.'
'कुणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला आहे.' अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
'विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ही जर एक सरकारची प्रवृत्ती असेल आणि सरकारी पक्षातले लोक विरोधकांवर पोलिसांच्या समोर हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही FIR नोंदवायला संघर्ष करावा लागत असेल तर अशा परिस्थितीत अशा बैठकीला जाऊन फायदा काय? अशी परिस्थिती आजवर महाराष्ट्रात आम्ही कधीही पाहिली नाही. सरकारतर्फे पोलीस संरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.'
'आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला गेला. अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाविरोधात बोलणं बंद करू असं त्यांना वाटत असेल तर गैरसमज त्यांनी तो काढून टाकावा. ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, ज्या प्रकारे मोहित कंबोज यांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपच्या लोकांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस टाकल्या जातात आहेत.'
'सत्ताधारी पक्ष इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. पोलिसांचा दुरूपयोग जाणीवपूर्वक केला जातो आहे. हा दुरूपयोगच आहे असं आम्हाला वाटतं. गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन उपयोग काय? त्यांना अधिकार आहेत का? सगळं जे काही चाललं आहे ते उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चाललं आहे. ही बैठक म्हणजे निव्वळ टाइमपास आहे का?'
'ज्या प्रकारे आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांच्यासोबत व्यवहार झाला ते पूर्ण चुकीचं होतं. त्यांनी काही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हल्ला करू, आंदोलन करू असं काहीही म्हटलेलं नव्हतं. फक्त हनुमान चालीसा म्हणणार हेच सांगितलं होतं. हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची का?' असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.