Maharashtra Live: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवारांना संताप अनावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्याचं नशीब फाटलं -धनंजय मुंडे

विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संबंध देशात नाहीतर जगात उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणारी एकमेव जात आहे, त्या जातीचं नाव शेतकरी आहे. ही शेतकऱ्याची जात प्रत्येक वेळी नैसर्गिक आणि आस्मानी संकटात आलेली आहे. आता आपलं अधिवेशन चालू असताना मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व परिसरातील सर्व पिकं घेणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यांची पूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली आहेत.

आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्याचं नशीब फाटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी स्थगन दिला. माझी विनंती आहे, परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एका जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. असंख्य पशुधन गेलं आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मागचं अनुदान एक रुपयाही मिळालेलं नाही. इतकी वाईट अवस्था आहे. उदाहरण द्यायचं असेल, तर बीड जिल्ह्याचं देऊ शकतो.

सरकार अनुदान जाहीर करत पण, शेतकऱ्याच्या खात्यावर येत नाही. म्हणून माझी विनंती आहे की, आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं, मनुष्यांचं आणि पशुधनाचं जे नुकसान झालं आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे”, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवारांचा सभागृहात संताप

विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झालेलं नुकसान आणि कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारला सुनावलं. यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे आदेश काढण्याची मागणी केली.

अजित पवार म्हणाले,”अधिवेशन चालू असताना कुठे काही मनुष्यहानी झाली, तर स्थगन घेतला जातो आणि चर्चा करतो. शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. सात दिवस झाले तरीही कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. गारपीट, अवकाळी पावसाने शेतमालांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षरशः शेतकरी आडवा झालेला असताना पंचनामे करायला कुणी नाहीये. मला सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करायचं आहे की, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, पण ज्या नैसर्गिक संकटात शेतकरी अडकलेला आहे. त्या शेतकऱ्याला माणुसकीच्या भावनेतून मदत करण्यासाठी त्या-त्या भागात तरी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावं आणि पंचनामे करावेत.”

ADVERTISEMENT

“नांदेडमध्ये तुफान गारपीट झालेली आहे. मराठवाड्यात हा आकडा वाढत चाललेला आहे. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कित्येक जनावर मृत्यूमुखी पडली आहेत. अंगावर वीज पडून विदर्भातही जीवत आणि पशुधन हानी झाली आहे.”

ADVERTISEMENT

“अधिवेशन जेव्हा चालू असतं तेव्हा सर्वांचं लक्ष सभागृहाकडं असतं. इथे आपला मुद्दा उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल. हे एकमेकांशी निगडित झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कर्मचारी संपावर आहेत. दुहेरी कात्रीत महाराष्ट्र अडकलेला असताना, त्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी समंजस भूमिका दाखवायला पाहिजे.”

“आम्ही सातत्याने सत्ताधारी आमदार काय बोलताहेत हे लक्षात आणून देतोय. एक सरकारी पक्षाचे आमदार म्हणाले, 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामची कमाई आहे. पटत का हे? संजय गायकवाड यांनी हे विधान केलं. पाचही बोटं सारखी नसतात, हे आम्हालाही कळत, पण तुम्ही सगळ्यांना एका मोजमापात धरायला लागलात आणि ते नाउमेद झाले, तर राज्य चालणार कसं?”

“विदर्भातील एका गावातील ग्रामस्थांनी स्वतःच शाळा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश काढले पाहिजेत, त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही,” अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सुनावलं.

हातात द्राक्षे, कांदा… विरोधकांचा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत असून, शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे. गहू, हरभऱ्यासह फळबागांचंही अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत असून, आज विरोधकांनी हातात कांदे, द्राक्षांसह शेतपिकांची टोपली घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Maharashtra news today live Marathi : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून, शेवटच्या आठवड्यात विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसाने कहर केला असून, अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं असून, विरोधकांकडून सातत्याने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे. शेवटच्या आठवड्यात सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी होऊ शकते. दुसरीकडे इतर मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या कोंडी शिंदे-फडणवीस कसं उत्तर देणार हेही महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT