राज्यपाल कोश्यारींची राजीनामा देण्याची इच्छा : १२ वादांनी गाजला कार्यकाळ

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra governor bhagat-singh koshyari controversy :

मुंबई : महाराष्ट्राचे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावरुन जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यांनी स्वतः राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राजभवनातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मनन करण्यात घालविण्याचा मानस असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधानांना कळवलं आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari expressed his desire to resign from the post of Governor to the Prime Minister narendra modi)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार! PM मोदींकडे स्वतःच केली मोठी मागणी

या १२ वादांमुळे कार्यकाळ गाजला :

  • २०१९ चा पहाटेचा शपथविधी :

ADVERTISEMENT

२१ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पहाटे पार पडलेला हा शपथविधी राजभवनावरच झाला. राष्ट्रपती राजवट एका रात्रीत उठवून राज्यपालांनी या दोघांना शपथ कशी काय दिली? हा प्रश्न सगळ्या राज्याला पडला होता. हे सरकार अवघं ७२ तास चाललं आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं हे आपण पाहिलंच.

ADVERTISEMENT

  • महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळीच संघर्षाची ठिणगी :

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे नेते के.सी. पडवी हे मंत्री म्हणून शपथ घेत होते. त्यावेळी त्यांनी शपथ घेताना काही ओळी आपल्या मनाने जोडल्या. यावरून राज्यपाल भगत सिंह हे पडवी यांच्यावर चिडले होते. मी सांगतो आहे त्याच भाषेत आणि तेवढीच शपथ घ्यायची आहे. आपल्या मनाची वाक्यं शपथेत घ्यायची नाही असं म्हणत राज्यपालांनी के.सी. पडवी यांना झापलं होतं. एवढंच नाही तर त्यांना शपथ पुन्हा वाचायला लावली होती.

  • लॉकडाऊनच्या काळात मंदिरं उघडण्यावरून उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं पत्र :

कोरोना असल्याने राज्यसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्ये काही गोष्टी काही प्रमाणात अटी शर्थींसह सुरू झाल्या. त्यानंतर भाजपने ठाकरे सरकार मंदिरं का उघडत नाही? असा प्रश्न विचारत आंदोलन केलं होतं. त्यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण केली होती. राज्यपाल विरूद्ध सरकार हा वाद तेव्हाही रंगला होता.

  • १२ आमदार नियुक्तीचा वाद :

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी तिन्ही पक्षांतून नावांची शिफारस केली होती. तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारशीला मंजुरीच दिली नव्हती. यावरुनच महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता.

  • कविता राऊत यांच्या नोकरीवरून महाविकास आघाडीवर टीका :

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनील केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य जानेवारी २०२१ मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यावेळीही ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल कोश्यारी हा संघर्ष झाला.

बाळासाहेब ठाकरे : कागद संपून जाईल पण बाळासाहेबांच्या आठवणी संपणार नाहीत!

  • महिलेच्या चेहऱ्यावरून मास्क काढल्याचं प्रकरण :

पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते काही सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी एका महिलेच्या चेहऱ्यावरचा मास्क राज्यपालांनी स्वतःच्या हाताने खाली ओढला. देशभरात सगळे मास्क लावण्याचं आवाहन करत असतानाचा तो काळ होता. कोरोनाच्या लाटा त्यावेळी महाराष्ट्रात येत होत्या. यावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

  • विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला परवानगी न देणं :

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक दिवस विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होते. या पदाची निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक घेण्याचे ठरविले. त्यानंतर सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणीही केली होती. मात्र यासाठी राज्यपालांनी परवानगी दिली नव्हती.

या निवडणुकीसाठी सरकारने नियम बदलला आणि गुप्त मतदान प्रक्रियेच्या ऐवजी आवाजी मतदान असा बदल केला. मात्र राज्यपालांनी ही आवाजी मतदानाची मागणी फेटाळून लावली होती. निवडणूक प्रक्रियेत करण्यात आलेला बदल असंवैधानिक आहे. असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी वेगवेगळी प्रक्रिया कशी काय असू शकते? असंही राज्यपालांनी म्हटलं होतं.

  • मॉडेलच्या फोटोमुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा वादात :

काही दिवसांपूर्वी मायरा मिश्रा नावाच्या एका मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या 11 व्या सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर मायरा मिश्रा चर्चेत आली होती. मायराने राजभवनात हे फोटोशूट केले होते. तिनं राजभवनावर राज्यपालांच्या खुर्चीसोबतही फोटो काढले होते. त्यावरून राज्यपालांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

राज्यपाल कोश्यारींची वादग्रस्त वक्तव्य :

  • महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य :

महाविकास आघाडी सरकार राज्यात असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सावित्रीबाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं होतं तेव्हा ज्योतिबा फुले १३ वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर पुढे या वयातली मुलं काय करतात हे विचारत ते हसले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

  • छत्रपती शिवरायांविषयींची वादग्रस्त वक्तव्य :

गुरुची महती पटवून देण्याच्या नादात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेलं विधान वादग्रस्त ठरलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता?

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईबाबत काय म्हटलं होतं?

“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्यानंतर आता त्यांनी अखेर माफी मागितली.

  • छत्रपती शिवरायांविषयींच दुसरं वादग्रस्त वक्तव्य :

त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी केलेलं आणखी एक वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य त्यांनी केलं होतं. राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT