
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉन व्हेरिएंट या दोन्हीमुळे महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे. मोंटलुपीरावीर या औषधाचा मुबलक साठा आधीपासूनच करून ठेवा असं आज राजेश टोपे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 80 लाख रूग्ण असू शकतात इशारा दिला आहे.
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा 20 लाख बाधित होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख बाधित झाले. जर कोरोनाची तिसरी लाट आली तर जानेवारी अखेर राज्यात 80 लाख रूग्ण असतील. फक्त आयसीयूमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ नाही तर नॅशनल हेल्थ मिशनमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळासाठी केंद्राने निधी द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औषधांची उपलब्धता खूप गरजेची बाब आहे. केंद्राकडे त्यासाठी मागणी केली आहे. केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसऱ्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत. लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.
...तर कठोर निर्बंध
महाराष्ट्रात सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासंदर्भात बोलताना राजेश टोपे यांनी आरसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. महाराष्ट्रात जर कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल तर निर्बंध लावण्यास हरकत नाही असे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसभरात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.1 टक्के झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 558 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 65 लाख 18 हजार 916 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातले रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.86 टक्के झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 95 लाख 9 हजार 260 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 30 हजार 494 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.