Maharashtra Nagar Panchayat Election: मतदानाची रणधुमाळी, 105 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदांसाठी मतदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यातील 105 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांसाठी मंगळवार (21 डिसेंबर) निवडणुका पार पडत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होत आहेत. एकूण 105 नगरपंचायती आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

अमरावती: दोन नगरपंचायतीच्या 30 सदस्य पदासाठी मतदान

अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या 30 सदस्यपदाकरिता आज मतदान होत आहे. यामध्ये 16,189 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये तिवसा नगरपंचायतच्या 14 जागेसाठी 62 उमेदवार रिंगणात असून भातकुलीच्या 16 जागेसाठी 60 उमेदवार रिंगणात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तिवसा नगरपंचायतवर सत्ता महिला व बालकल्याण मंत्री, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची होती तर भातकुली नगरपंचायतवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती. त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याने सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळाला. मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

यवतमाळ: सहा नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात; 84 जागांसाठी 435 उमेदवार

ADVERTISEMENT

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, बाभूळगाव, कळंब, मारेगाव, महागाव, आणि झरी या सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत 84 जागांसाठी 435 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यासाठी 47 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.  

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. राळेगाव नगरपंचायतीत 14 जागांसाठी 82 उमेदवार रिंगणात आहेत. कळंब नगरपंचायतीमध्ये 13 जागांसाठी 63 उमेदवार.

महागाव नगरपंचायतीमध्ये 13 जागासाठी 91, मारेगाव नगरपंचायतीमध्ये जागांसाठी 14 जागांसाठी 90, झरीजामणी नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी 87 तर बाभूळगाव ग्रामपंचायतीमध्ये 13 जागांसाठी 62 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. याबरोबरच ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी मतदान होत आहे.

बाभूळगावात 5 हजार 70 मतदार असून पुरुष मतदार 2 हजार 544, तर महिला मतदारांची संख्या 2 हजार 526 इतकी आहे.

कळंब नगरपंचायतीत 14 हजार 206 मतदार आहेत. त्यात पुरुष 7 हजार 88, महिला 7 हजार 118, राळेगावात 12 हजार 527 मतदार आहेत. झरीजामणी येथे 2 हजार 268, महागावमध्ये 7 हजार 520, तर मारेगाव नगरपंचायतीमध्ये 6 हजार 507 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.

गोंदिया: जिल्ह्यात मतदानाला सुरुवात मतदान

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत असून आज 21 डिसेंबर रोजी मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झालं आहे. यावेळी मतदार आपला मताचा हक्क बजाविण्याकरिता मतदान केंद्रावर पोहचत आहे. थंडी जास्त प्रमाणात असूनसुद्धा मतदार मतदान केंद्रावर येत आहे.

सांगली: तीन नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठया रांगा लागल्या आहेत. कवठेमहांकाळ, खानापूर आणि कडेगाव या नगरपंचायतीची निवडणूक होत असून, प्रत्येकी 13 जागांसाठी 125 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर 40 मतदान केंद्रावर 23 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष आघाडी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांचा पॅनल विरोधात भाजपा खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना नेते अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे आणि काँग्रेसचे स्थानिक नेत्यांच पॅनल यांच्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.

कडेगाव नगरपंचायतमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर स्थानिक आघाड्या अश्या बहुरंगी लढत असून कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रमसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

खानापूर नगरपंचायतमध्ये सध्या काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता असून याठिकाणी काँग्रेस, शिवसेना आघाडी विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

वर्धा: 21 चार नगरपंचायतकरिता मतदान

वर्धा जिल्ह्यातील सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर या चार नगरपंचायतीकरीता मतदान प्रक्रियेला सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. 4 नगर पंचायतीमध्ये 54 जागांकरिता आज मतदान होत आहे. त्याकरिता 223 उमेदवार रिंगणात आहेत. 28 हजारांवर मतदार आहेत.

मतदान प्रक्रियेकरिता पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सकाळच्या प्रहरात थंडीमुळ मतदारांची केंद्रावर तुरळक संख्या दिसून येते आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये भाजपा व काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

  • कारंजा (घाडगे) – 11 हजार 22 मतदार 

  • आष्टी (शहीद) – 8 हजार 554 मतदार

  • सेलू – 11 हजार 258 मतदार 

  • समुद्रपूर – 6 हजार 452 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दापोली, मंडणगड: दापोलीत 13 जागांसाठी 43, तर मंडणगडमध्ये 13 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली, मंडणगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला आज सकाळपासून शांततेत सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अनिल परब, शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील वादामुळे या निवडणुका कधी नव्हे त्या यावर्षी चर्चेत आहेत. 

गेल्या दहा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्याने त्याचे राजकीय पडसाद दोन्ही तालुक्यातील राजकीय पटलावर उमटत आहेत.

  • मंडणगडमध्ये 13 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात

मंडणगड नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले आजमावत आहेत. नगर पंचायतीच्या 13 प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी व सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार मंडणगड शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

शहरातील 2878 पात्र मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. यात 1456 महिला व 1422 पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 

  • दापोलीत 13 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात

दापोली नगरपंचायतीसाठी 13 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 43 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण 11 हजार 848 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दापोलीत 15 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या केंद्रांवर 105 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12 कर्मचारी राखीव ठेवले आहेत. 3 अधिकाऱ्यांची झोनल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दरम्यान, नगर पंचायत निवडणुकीत संभाव्य पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दापोलीत राजकीय पक्षाची वैचारिक गणित न जुळल्याने निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांसह अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे

बीड: 5 नगरपंचायत मतदान प्रक्रियेला सुरुवात, 65 जागांसाठी 216 उमेदवार रिंगणात

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरूर कासार, पाटोदा आणि आष्टी या पाच नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. एकूण 65 जागांसाठी 216 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान थंडीच्या कडाक्यात मतदारांचा प्रतिसाद कमी दिसून येत आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झालीय. संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

नागपूर: जिल्ह्यातील हिंगणा आणि कुही नगर पंचायती साठी मतदान

हिंगणामधील 13 जागांसाठी 47 तर कुही येथे 13 जागांसाठी 52 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या दोन्ही नगर पंचायत क्षेत्रात ओबीसी आरक्षणासाठी राखीव प्रवर्गाच्या प्रत्येकी चार-चार जागा खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारीला मतदान होईल.

या दोन्ही निवडणुकांचे निकाल 19 जानेवारीला जाहीर करण्यात येतील. उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबर च्या आरक्षण सोडतीनंतर सुरू होणार आहे. हिंगणा नगरपंचायत क्षेत्रात 13 वॉर्डात एकूण 47 उमेदवार रिंगणात आहेत.

नांदेड: जिल्ह्यातील तीन नगर पंचायतीसाठी मतदानाला

सकाळच्या सत्रात थंडीचा कडाका असल्याने मतदार आता हळूहळू मतदानासाठी बाहेर पडत आहेत. जिल्ह्यातील नायगाव, माहूर आणि अर्धापूर नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यापैकी अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळतेय.

मंत्री अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी अर्धापूरमध्ये मोठया प्रमाणात प्रचार करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जिल्ह्यातील तीन नगरपंचायतसाठी आज मतदान होत आहे.

नायगाव, माहूर, अर्धापूर नगरपंचायतीसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या तीन नगरपंचायतमध्ये एकूण 51 जागा पैकी 40 जागेवर मतदान होत आहे. या तीन ही नगरपंचायत नायगाव-3, माहूर- 4, अर्धापुर- 4 ठिकाणी 11 जागा ओबीसी आरक्षित असल्यामुळे त्याठिकाणी त्या वॉर्डमध्ये मतदान होणार नाही.

  • नांदेड जिल्ह्यातील नायगाव- 17 जागा पैकी 14 जागेसाठी मतदान होत आहे.

  • माहुर- 17 जागा पैकी 13 जागेसाठी मतदान होत आहे.

  • अर्धापूर- 17 जागा पैकी 13 जागेसाठी मतदान होत आहे.

OBC आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, Pankaja Munde यांचा ठाकरे सरकारला इशारा

वाशिम: मानोरा नगरपंचायतच्या निवडणुकीला सुरुवात

मानोरानगर पंचायतमध्ये एकूण 17 प्रभागासाठी मतदान होणार होते. मात्र, न्यायालयाने ओबीसीला स्थगिती दिल्यामुळे 4 प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने प्रत्यक्षात 13 प्रभागासाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी 59 उमेदवार रिंगणात असून, सहा हजार 13 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान याआधी मानोरा नगरपंचायत वर बहुजन वंचित आघाडी आणि स्थानिक विकास आघाडी ची सत्ता होती. मात्र यंदा हे दोनही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे यंदा चित्र वेगळं राहणार आहे.

त्याचबरोबर राज्यात असलेली महाविकास आघाडी मानोरा येथे होईल असे वाटत असताना वेळेवर बिघाडी झाल्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर भाजप आणि वंचितने आपले उमेदवार केले असल्यामुळे बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत.

सत्ता येण्याचे सर्वच पक्ष दावे करीत असले तरी खरं चित्र मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT