Solapur : फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर : बार्शीमधील पांगरी येथील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्फोट झालेल्या कारखान्याला कोणताही परवाना नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. २००७ साली युसूफ मणियार यांना कारखाना सुरु करण्यासाठी परवानगी होती. मात्र तो परवाना ज्या ठिकाणी दिला होता तिथं सोडून त्यांनी दुसरीकडेच विनापरवाना दुसरा कारखाना सुरु केला होता, अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोणत्याही निकषाचे पालन न करता पत्राच्या शेडमध्ये हा कारखाना आणि गोडाऊन सुरु करण्यात आलं होता. देशात १५ किलोपर्यंतच्या दारुसाठ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवाना दिला जातो. त्यापेक्षा जास्त दारूसाठा असल्यास त्याची परवानगी ही PESO अर्थात Petroleum and Explosives Safety Organization मार्फत दिली जाते. मात्र स्फोट झालेल्या ठिकाणी नियमापेक्षा जास्त दारुसाठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे तपासण्यासाठी प्रशासनतर्फे Explosives एक्सपर्टची एक टीम देखील बोलवण्यात आली आहे.

सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल जिथं स्फोट झाला त्याचा परवाना तपासण्याचंही काम प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी दोन आस्थापना आहेत ही वस्तुस्थिती आहे. एक कारखाना आणि एक गोडाऊन होते अशी माहिती आहे. मात्र गोडाऊनमध्ये काम सुरु होतं का, आग लागण्याचे नेमके कारण काय हे पोलीस तपासात समोर येईल. पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फॅक्टरी मालक युसूफ मणियार आणि नाना पाटेकर दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल :

दरम्यान, या स्फोटाप्रकरणी फॅक्टरी मालक युसूफ मणियार आणि सहभागीदास नाना पाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सहाय्यक फौजदार सतीश कोठावळे यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर भा.द.वि. 304 , 337 , 338 , 285 , 286 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. युसूफ मणियार आणि नाना पाटेकर हे दोन्ही आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे.

पांगरी स्फोटात तिघांचा मृत्यू :

पांगरी गावात शिराळा रोडला ४ एकर क्षेत्रात फटक्यांची फॅक्टरी आहे. रविवारी फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे. तर अन्य तीन जखमींना पांगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT