“..तर मुंबईतल्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल” एसी लोकलवरून जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या एसी लोकलचा मुद्दा मुंबईतल्या उपनगरांमध्ये पेटला आहे. कारण तीन दिवसांपूर्वीच कळवा स्थानकात एसी लोकल अडवण्यात आली होती. एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी आक्रमक झाले आहेत. ठाणे आणि बदलापूर या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांचा संताप पाहण्यास मिळाला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. एसी लोकलच्या मुद्द्यावरून त्यांनी चांगलीच टीका केली आहे.

AC Local : मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या, वेळापत्रक जाहीर

जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलबाबत नेमकं काय म्हटलं आहे?

“१० एसी लोकलमधून ५ हजार ७०० प्रवासी प्रवास करतात आणि एका साध्या लोकलमधून २७०० प्रवासी प्रवास करतात. मग उरलेले प्रवासी कोणत्या ट्रेनने प्रवास करणार? त्याला कोणताही पर्याय शोधण्यात आलेला नाही. लोक ट्रेनच्या दरवाजांना लटकून मरत आहेत. लोकांना गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये चढता येत नाही. लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एसी लोकलच्या विरोधात आधी कळव्यात आंदोलन झालं आणि मग ते मुंबईत पसरतं आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने लोकांचा संताप वाढला आहे. कारण लोकांना एसी लोकल परवडतच नाही. ही परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक स्टेशनवर आग लागेल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एसी लोकलच्या विरोधातलं आंदोलन पेटवायची गरजच नाही

एसी लोकलच्या या मुद्द्यावरून मी मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी बोलतो आहे. परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतल्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल. मी तर आत्ता मैदानात उतरलो आहे. सर्वसामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित आहे. आंदोलनासाठी मध्यमवर्गीय रस्त्यावर येत नाहीत. पण जेव्हा मध्यमवर्गीय लोक रस्त्यावर उतरत असतील तर अस्वस्थता किती आहे तेच लक्षात येतं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दोन महिन्यात १७० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू

जितेंद्र आव्हाड पुढे हेदेखील म्हणाले की दोन महिन्यात १७० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. लोकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? हे आंदोलन मला पेटवण्याची गरजच नाही. लोकांच्या मनातच आग लागली आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच मध्य रेल्वेला सामान्य प्रवाशांविषयी प्रेमच उरलेलं नाही अशीही टीका आव्हाड यांनी केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून येणारं उत्पन्न हे देशात सर्वाधिक आहे. त्यावर देशातल्या अनेक रेल्वे गाड्या पोसल्या जातात. आता एसी लोकल आणून तुम्ही ही सगळी परिस्थिती कठीण करत आहात असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT