काँग्रेसच्या नेत्यांना कुणीही मोजत नाही; वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानावर गडकरी संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देवेंद्र फडणवीस यांची जिरवल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कानात सांगितलं होतं, असं खळबळजनक विधान राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त नितीन गडकरी यांनी वडेट्टीवारांना कडक शब्दात सुनावलं.

देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू असून, प्रचारात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ३६ चा आकडा असल्याचा दावा केला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जमत नसल्याचं नागपूरकरांना माहिती आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांची जिरवल्याचं नितीन गडकरी यांनीच आपल्या कानात सांगितलं होतं, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी प्रचारसभेत बोलताना केलं.

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरी यांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं असून, वडेट्टीवारांना सुनावल आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये’, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितलं, असं जे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यांचं वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटं आणि बेजबाबदारपणाचं आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत’, असं गडकरी म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

‘एकमेकांच्या विरोधात काड्या करणं आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली’, असं म्हणत गडकरींनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

‘विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात’, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT