
1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत असा सणसणीत टोला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाकडे पक्षाची जबाबदारी जाते आणि परिवारवादी पक्ष होतो तेव्हा सर्वात आधी टॅलेंटची हत्या होते असंही मोदींनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना काँग्रेसवर नरेंद्र मोदींनी एकामागोमाग एक प्रहार केला आहे. त्यामुळे राज्यसभेत एकच गदारोळ झाला.
नेमकं काय म्हणाले मोदी?
लोकशाही काँग्रेसच्या मेहरबानीमुळे निर्माण झालेली नाही. 1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला त्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत. 1947 ला गर्व करून सांगायला हवं होतं की आमचा भारत ही लोकशाहीची जननी आहे. मात्र ते बोलले नाही. भारतात लोकशाही काँग्रेसने आणलेली नाही. लोकशाही आणि वादविवादाची परंपरा हजारो वर्षांपासून देशात सुरू आहे. काँग्रेसने परिवारवादापुढे कसला विचारच केला नाही.
आज जे लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत त्यांनी जरा विचार करावा की भारतात लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा परिवादी पक्षांचा आहे. ही बाब मान्यच करावी लागेल. एवढंच नाही तर पक्षापेक्षा जेव्हा परिवार मोठा होतो तेव्हा सर्वात पहिली हत्या होते ती टॅलेंटची हे कुणीही विसरता कामा नये. देशाने एक दीर्घ काळ या परिवारवादामुळे खूप भोगलं आहे. देशातल्या सगळ्या पक्षांनी आपला सर्वांगिण विकास केला पाहिजे. भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेस या पक्षाची जबाबदारी सर्वाधिक आहे.
या सभागृहात हे म्हटलं गेलं की काँग्रेस नसती तर काय झालं असतं? इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया हेदेखील म्हटलं गेलं. मात्र मी हे सांगू इच्छितो की मी विचार करतो की काँग्रेस नसती तर काय झालं असतं? कारण महात्मा गांधी यांची इच्छा होती. काँग्रेस नसती ही महात्मा गांधींची इच्छा जर पूर्ण झाली असती तर काय झालं असतं? तर लोकशाही परिवारवादापासून मुक्त झाली असती. भारत विदेशी ऐवजी स्वदेशी संकल्पांच्या मार्गावर चालला असता. जर काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक देशाला लागला नसता. दशकानुदशके भ्रष्टाचार वाढला नसता. जर काँग्रेस नसती तर जातीवाद आणि सीमावाद यांची खाई एवढी गहिरी झाली नसती.
काँग्रेस नसती तर शिखांचं शिरकाण झालं नसतं. वर्षानुवर्षे पंजाब दहशतवादाच्या आगीत जळाला नसता. काँग्रेस पक्ष नसता तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावं लागलं नसतं. काँग्रेस पक्ष नसता तर मुलींना तंदूरमध्ये घालून जाळण्याच्या घटना घडल्या नसत्या. देशात सामान्य माणसाला घर, रस्ता, वीज या मूलभूत सुविधांसाठी एवढ्या वर्षांपर्यंत वाट बघावी लागली नसती. मी इथे यादी मोजत बसेन पण ती न संपणारी आहे. काँग्रेस सत्तेत असताना देशाचा विकास केला नाही. आता विरोधात असताना देशाच्या विकासात बाधा आणत आहेत. काँग्रेसला राष्ट्रवरही आपत्ती आहे. राष्ट्राची संकल्पना जर गैर संवैधिनिक आहे तर तुमच्या पार्टीचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस का ठेवलं आहे? असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकेचे ताशेरे काँग्रेसवर झाडले. जर नवा विचार करत असाल तर पक्षाचं नाव बदला असंही त्यांनी सुनावलं आहे.