
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली असल्याची माहिती दिली. पोलीस बदल्यांच्या महाघोटाळ्यातील संवेदनशील माहिती बाहेर कशी आली, याबद्दल चौकशी करण्यासाठी बोलावलं आहे. मी राज्य सरकारचं षडयंत्र उघडं पाडल्यानं हे केलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "१२ मार्च रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. तीन दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि घाव मनावर कायम आहेत. एकीकडे १२ मार्च १९९३ च्या स्फोटात शहीद झालेल्या मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचवेळी बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार करणारे, तुरुंगात जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहे, याबद्दल खंत व्यक्त करतो," असं फडणवीस पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हणाले.
"मी आज जे काही बोलणार आहे. मार्च २०२१ मध्ये भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा गृह मंत्रालयातील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्यांच्या ट्रान्सस्क्रिप्ट पेनड्राईव्ह मध्ये आहे. ते मी देशाच्या गृह सचिवांकडे सुपूर्द करत असल्याचंही सांगितलं होतं. त्यानुसार या घोटाळ्याची सगळी माहिती दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांना ही माहिती दिली."
"त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने यासंदर्भातील संपूर्ण चौकशी सीबीआयकडे दिली आहे. या बदल्या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. अनिल देशमुखांचीही चौकशी केली जाणार आहे. अनेक महत्त्वपूर्ण यातील बाबी समोर येत आहे. ज्यावेळी ही चौकशी सीबीआयकडे गेली, त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्यासाठी एक गुन्हा दाखल केला. गोपनीय माहिती फुटली कशी अशा स्वरुपाचा हा गुन्हा आहे", असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"या गुन्ह्यासंदर्भात मला पोलिसांकडून प्रश्नावली पाठवण्यात आली. जी काही माहिती आहे, ती देईन, असं उत्तर दिलं होतं. खरंतर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून हा माझा अधिकार आहे. माझी माहिती कुठून आली हा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. पुन्हा मला तेच पाठवण्यात आलं. त्यानंतर न्यायालयात सांगण्यात आलं की,वारंवार माहिती मागवूनही उत्तर दिलं जात नाही", असं फडणवीस म्हणाले.
"मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी १६० नोटीस पाठवली आहे. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मला त्यांनी बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात बोलवलं आहे. पहिल्यांदा स्पष्ट करतो की, जरीही मला अधिकार असला आणि माहिती स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. ही सर्व माहिती मी थेट केंद्रीय गृह सचिवांना दिली आहे. त्यातील कुठलीही माहिती बाहेर येऊ दिली नाही. जी काही माहिती बाहेर आली, ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी माध्यमांना दिली आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहे",अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
"मी स्वतः पोलीस ठाण्यात जाणार आहे. पोलिसांना योग्य ते उत्तर देणार आहे. मी राज्याचा गृहमंत्री राहिलेलो आहे. पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केलेला असला, तरी पोलिसांनी तपासात माझं सहकार्य मागितलं असून, मी देईन. माझी अपेक्षा एवढीच आहे की, माहिती बाहेर कशी आली, याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी म्हणजे सहा महिन्यांपासून सरकारकडे हा अहवाल पडलेला होता. त्या अहवालात कुणी किती पैसे दिले अशी माहिती आहे. ही संवेदनशील माहिती असताना सरकारने कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे, असा सवाल आहे."
"सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिली. अधिकृतरित्या सगळी माहिती राज्य सरकारला सीबीआयकडे द्यावी लागली. विशेषतः परवा षडयंत्राचा भांडाफोड मी केला आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसातील अधिकाऱ्यांना उत्तर सुचत नसल्याने ही नोटीस दिली गेलीये. मी उद्या ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहिन", असं विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले.