Sanjay Raut बोलले अन् सत्ताधारी पेटले… विधानसभेत राडा, मीडियासमोर शिवीगाळ!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut’s controversial statement and Controversy: मुंबई: शिवसेना (Shiv Sena UBT)पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच वादग्रस्त विधान करणं हे संजय राऊतांना चांगलंच भोवलं आहे. कारण याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणला आहे. तसंच विधानसभा (Vidhan Sabha) आणि विधान परिषदेचंही (Vidhan Parishad) कामकाज बंद पाडलं. यावेळी सत्ताधारी आमदारांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला पण सरकारला महागाईच्या मुद्द्यावर चर्चाच करायची नव्हती म्हणून राऊतांचा मुद्दा मोठा करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. जाणून घ्या राऊतांच्या वक्तव्यावर कोणकोणत्या आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण सविस्तर पाहूयात. (sanjay raut controversial statement and the ruling party was on fire uproar in assembly abuse on the steps)

सगळ्यात आधी ज्यावरून वाद झाला ते संजय राऊत यांचं नेमकं काय वक्तव्य आहे ते आपण पाहूयात:

कोल्हापूर येथे बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना एक विधान केलं. त्यावरून वाद निर्माण झाला. “सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. असे गेल्या सहा महिन्यात या सरकारने ईडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला. जे विरोधात आहेत. त्यांना तुरुंगात टाकायचं. खोटे गुन्हे दाखल करायचे. बदनाम करायचं. लक्षात ठेवा. 2024 ला याचा हिशोब केला जाईल”, असं विधान संजय राऊतांनी केलं.

“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं.

संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरून सत्ताधारी आमदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पाहा राऊतांबाबत नेमक्या त्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भरत गोगावलेंनी वापरले संजय राऊतांना अपशब्द

माध्यमांसमोर येताच शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आणि काही आमदारांनी संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी केली तसेच त्यांना शिव्याही दिल्या.. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना गोगावले पुढे म्हणाले की, ‘संजय राऊतने जे वक्तव्य केलं आहे ते सभागृहाला केलंय. ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. आमची मागणी आहे की, त्याला तातडीने अटक करावी. त्याला जे शासन आहे ते करावं. जर आम्ही चोर असलो तर सभागृहात प्रश्न कोण मांडणार? म्हणून आम्हाला सिद्ध करायचं की, चोर आम्ही आहोत की संजय राऊत..’

‘जनतेचे प्रश्न आजचे उद्या मांडू.. पण आम्हाला जर डाग लागला तर आमच्या आयुष्यातून तो पुसला जाणार नाही. आमची मतं घेऊन जो तिथे खासदार झालाय.. त्याच्यात हिंमत आणि नितीमत्ता असेल तर त्याने ताबडतोब राजीनामा द्यावा आणि लढवून द्यावा. जर राऊतमध्ये हिंमत असेल तर त्याने पुरवलेली सुरक्षा नाकारावी.. मग बघू हा खरा शिवसैनिक आहे की खोटा.’ असं भरत गोगावले यावेळी म्हणाले.

संजय राऊत डाकू आहे डाकू…: संजय बांगर

‘हा संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतो आणि आम्हाला चोर म्हणतोय.. हा संजय राऊत डाकू आहे डाकू.. याच्यावर ३९५ चा गुन्हा दाखल करावा… आम्हाला ज्या पद्धतीने चोर म्हणतोय.. तसंच तो उद्धव आणि आदित्य साहेबांना पण चोर म्हणतोय.. या हX#%#$ या महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही.’ अशी टीका संतोष बांगर यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊतला तात्काळ अटक करा: अब्दुल सत्तार

‘आमचं दुर्देव आहे की… ज्या माणसाला आम्ही राज्यसभेवर पाठवलं.. तो माणूसच ज्याला सभागृहाच्या माध्यमातून राजकारण करण्याची संधी मिळाली. त्यांनी जे शब्द वापरले त्याला तीव्र शब्दात सर्व आमदारांनी समाचार घेतला आहे. माझं म्हणणं आहे की, त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे.’ असं म्हणत अब्दुल सत्तारांनी राऊतांच्या अटकेची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग

राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा: उदय सामंत

‘संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की, ५० आमदार बाजूला गेले.. सत्तापरिवर्तन झालं म्हणून जो राग होता तो शिव्यांमधून व्यक्त होत होता. पण ज्या विधिमंडळातून ते स्वत: राज्यसभेचे सदस्य झाले आहेत त्याच विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं जनतेचा अपमान आहे. असं करताना त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता.’

‘संजय राऊत 40 आमदारांना शिविगाळ करतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही.. मनोरंजन म्हणून बघतो.. त्याला किंमत पण देत नाही. पण जेव्हा ते विधिमंडळाला चोरमंडळ म्हणतात तेव्हा त्याचा खुलासा विरोध पक्षाने पण केला पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राऊतांचं बेजबाबदार वक्तव्य: प्रविण दरेकर

‘विधीमंडळ हे सार्वभौम आहे त्याला चोर मंडळ म्हणाल्याने त्यांच्यावर हक्कभंग दाखल करावा, राऊतांना तात्काळ अटक करावी.. संजय राऊतांची अटक.. आणि त्यांचं बेजबाबदार वक्तव्य.. ज्यांची मजल विधीमंडळाला चोर म्हणण्यापर्यंत गेली त्यांच्यावर कारवाईची मागणी करत विधीमंडळ बंद पडलं.’ असं प्रविण दरेकर म्हणाले.

संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेधच, पण…: नाना पटोले

‘सत्ता पक्षाकडून ठरवून आजच्या गॅस दरवाढीचं, शेती पंपाचं कनेक्शन कापणं.. महागाई यावरून हल्ला होणार आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल.. आजचा दिवस कसा मोडून काढता येईल याची रणनिती सत्ता पक्षाने.. भाजपने केली होती.’

‘राऊतांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते निषेधार्थच आहे. त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. हा विधीमंडळाचा नाही तर राज्यातील जनतेचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. अध्यक्षांना थेट कारवाईचा अधिकार होता. हक्कभंगावर तात्काळ निर्णय द्यायला हवा होता. पण त्यावर निर्णय दिला गेला नाही. पण या गोष्टीचा मुद्दा बनवत दिवसभराचं कामकाज वाया घालवलं.’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षावरच निशाणा साधला.

Raut: संजय राऊत कायद्याच्या कचाट्यात? शिवसैनिकाची तक्रार, गुन्हा दाखल

सरकारने मुद्दाम आजचा दिवस वाया घालवला: रोहित पवार

‘मला असं वाटतं की, सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची नव्हती. कारण त्यांना माहित होतं की, आम्ही वीजेचा विषय घेणार आहोत. पण हा विषय घेऊ नये म्हणून संपूर्ण दिवस वाया घालवला..’

‘कोणीही विधानसभेवर बोलत असेल तर त्याचा आम्ही निषेधच करतो. पण अधिवेशनात अध्यक्षांनी त्यावर निर्णय दिला की, त्यानंतर सामान्य लोकांच्या प्रश्नावर व्हायला हवी होती.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

संजय राऊत माफी मागणं शक्य आहे का?, ते भाजपसमोर गुडघे टेकणार नाही: सुनील राऊत

‘संजय राऊत हे हक्कभंगाला घाबरत नाही. संजय राऊत ही घाबरणारी व्यक्ती नाही… संजय राऊतांवर जी कारवाई करतायेत ती चुकीची आहे. जे विधान संजय राऊतांनी विधानभवनच्या बाहेर म्हटलं आहे. हे विधान असं आहे. की, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी, बेईमानी केलीए.. ज्यांनी शिवसेना नाव चोरलं आहे.. त्यांच्याबाबतीत हे वाक्य संजय राऊत बोलले आहेत. त्यामुळे संजय राऊतच नव्हे तर महाराष्ट्रातील, देशातील संपूर्ण जनता ही संजय राऊतांच्या वाक्याशी सहमत आहे. त्यामुळे हक्कभंग जरी पास केला असला तरी संजय राऊत या कारवाईला घाबरणार नाही.’

‘ईडीने सुद्धा संजय राऊतांवर चुकीची कारवाई केली. तेव्हा देखील त्यांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही. त्यांनी जेलमध्ये जाणं पत्करलं. संजय राऊत माफी मागणार नाहीत… का मागतील ते माफी? संजय राऊत माफी मागणार… शक्य आहे का? जे भाजपसमोर झुकले नाही ते माफी मागणं अजिबात शक्य नाही…’ अशी प्रतिक्रिया संजय राऊतांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT