श्रीधर पाटणकरांवर ईडीची कारवाई; राऊत म्हणाले, ‘आम्ही सर्व तुरुंगात जायला तयार’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना आज ईडीने जोरदार झटका दिला. ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स जप्त केले. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारलाच आव्हान दिलं. “आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, पण आम्ही लढणार आणि तुमच्या बदल्याचं राजकारण समोर आणणार”, असं राऊतांनी म्हटलं आहे.

श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने आज निवेदन प्रसिद्ध करून दिली. या बातमीचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. जप्तीच्या या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुरातून प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजप, मोदी सरकार, केंद्रीय यंत्रणा, न्याय व्यवस्था आणि प्रशासन अशा सर्वच घटकांच्या भूमिकांवर सडकून टीका केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सगळ्यात मोठी ब्रेकींग न्यूज: रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ED कडून जप्त

काय म्हणाले राऊत?

ADVERTISEMENT

“राजकीय दबाव, सुडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, तसेच केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला झुकवू शकतो. नमवू शकतो, हे विरोधकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जिथे जिथे भाजपाची सरकारं नाही, तिथे तिथे अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यांच्या पत्नीलाही नोटीस आली आहे”, असं सांगत राऊत यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं.

ADVERTISEMENT

“एखाद्या राज्यात आपण निवडणूक हरलो म्हणून ज्यांनी पराभव केला, सत्ता खेचून घेण्यासाठी त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशाप्रकारे दबाव आणणे ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे. ईडीच्या कारवायांसंदर्भात संसदेत कालच माहिती आली. सर्वाधिक कारवाया जिथे भाजपचं सरकार नाही, त्या राज्यांत झाल्या आहेत. युपीएच्या ११ वर्षाच्या काळात फारतर २२ किंवा २३ कारवाया झाल्या असतील. मोदींचं सरकार आल्यापासून साधारणतः २५०० च्या आसपास या कारवाया झाल्या आहेत. त्यातील अनेक कारवाया चुकीच्या पद्धतीने झाल्याचं नंतर न्यायालयात स्पष्ट झालेलं आहे. पण, न्याय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, केंद्रीय यंत्रणा या हुकुमशाही प्रवृत्तींच्या गुलामासारखं वागत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे,” असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर ED च्या कारवाईचं नेमकं प्रकरण तरी काय?

“श्रीधर पाटणकर यांचं नातं फक्त उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांचा पुरतं मर्यादित नाही. ते आमच्या सर्वांचे कुटुंबातील सदस्य सारखे आहेत. ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही; त्या त्या राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा जोरदार कारवाया करत आहेत. इतर मोठ्या राज्यांमध्ये ईडीने त्यांची कार्यालयं बंद केली आहेत.”

“ना बंगाल झुकणार, ना महाराष्ट्र तुटणार. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख स्तंभांना दबावात आणून तुम्हाला वाटत असेल की, हे सरकार पडेल किंवा राष्ट्रपती शासन लागेल, तर तुम्ही झोपेतून जागे व्हा. आम्ही लढणार! सध्याच्या वातावरणात आम्ही न्यायालयाकडून ही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.सर्वात मोठं न्यायालय जनतेचं न्यायालय असते. महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबाशी परिचित आहे”, असं राऊत म्हणाले.

“कधी न कधी राजकीय सूड बुद्धीच्या या कारवाईचं उत्तर द्यावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत न्यायालये सुद्धा दबावात आहे. याआधी असं कधीच घडलं नाही. ही तानाशाहीची धोकादायक सुरुवात आहे. चार राज्यात तुम्ही जिंकले म्हणजे देशाचे मालक झाले नाहीत. आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल, तर तयारी करून घ्या. आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत; मात्र या देशाचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी आम्ही लढा देऊ.”

“२०१७ तर सोडा २००५ पासूनचे हे प्रकरण बाहेर काढले आहे. जेव्हा पीएमएलए कायदा तयार झाला नव्हता. त्याच्या आधीचं हे प्रकरण काढून लोकांना त्रास दिला जात आहे. जे काही होत आहे ते योग्य नाही”, असंही राऊत म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT