
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार हे शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. पिंपरीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर केंद्र सरकारची भूमिका त्यांना समजून घेण्याची नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. या सगळ्यात त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान यातले शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र पंजाबमधले शेतकरी सर्वाधिक आहेत. पंबाज अशांत होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
पंजाब अशांत होऊ देऊ नका...
पंजाब पुन्हा एकदा अशांत होऊ देऊ नका आपण पंजाब अशांत असल्याची मोठी किंमत मोजली आहे. इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत ही किंमत आपल्या देशाने मोजली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पंजाब हे आपल्या देशाच्या सीमेवरचं राज्य आहे. सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा आप्लया देशाने अशांत पंजाबची किंमत मोजली आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत ही किंमत मोजली आहे.
एवढंच नाही तर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी अन्न-पुरवठ्यात मोठं योगदान देशासाठी दिलं आहे. या देशाच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात भाषणं देता, इंच इंच लढवू म्हणता. मग पंजाबच्या सीमेवरचा माणूस खऱ्या अर्थाने याच परिस्थितीला तोंड देतो आहे. असा त्याग करणारा घटक जर काही प्रश्नांसाठी आग्रही असेल तर त्याकडे देशाच्या राजकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
वसुलीच्या चीपवर फडणवीसांना उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर टीका करत महाराष्ट्रात दलालीचं रॅकेट चालतं आणि वसुलीसाठी चीप तयार करण्यात आली आहे त्याद्वारे या सगळ्या वसुलीचा हिशोब ठेवला जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या पदाला एक प्रकारचा मान असतो. मी पण त्या पदावर होतो मात्र फडणवीस असे आरोप करून त्या पदाच्या सन्मानाला धक्का पोहचवत आहेत. वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर असेल तर ती त्यांनी दाखवावी म्हणजे आमच्याही ज्ञानात थोडी भर पडेल असाही टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी जे भाषण दसरा मेळाव्यात केलं आणि त्यानंतर फडणवीसांनी जी टीका केली ती मला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.