Vidhansabha Speaker Election: ठरलं… विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ‘या’ दिवशी होणार, कोण असणार नवा अध्यक्ष?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद जवळजवळ वर्षभरापासून रिक्त आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीकाही केली जात होती. मात्र आता विधानसभेला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. कारण बहुप्रतिक्षीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त आता ठरला आहे. 27 आणि 28 डिसेंबरला अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

27 डिसेंबरला निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येईल तर 28 डिसेंबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदी नेमकी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

..म्हणून घ्यावी लागतेय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेस नेते नाना पटोले हे सुरुवातीला विधानसभेच्या अध्यक्षपदी होते. मात्र, काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद त्यांना देण्यात आल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा त्याग केला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदावर सातत्याने काँग्रेसकडून हक्क सांगितला जात आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी हे पद काँग्रेसच्या वाट्याला गेलं होतं. पण नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे या पदावरुन तीनही पक्षात कुरबुरी पाहायला मिळत होत्या. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता हे पद काँग्रेसलाच देण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

भाजपही लढवणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक?

ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप देखील उमेदवार रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे. 2019 ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने किसन कथोरे यांना उमेदवारी दिली होती.

ADVERTISEMENT

मात्र, शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज मागे घेऊन अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात आली होती. मात्र, आता दोन वर्षांचा काळ लोटला असून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. अशावेळी भाजप यावेळेस निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

आवाजी मतदानाने होणार निवडणूक?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमात बदल केला आहे. त्यामुळे गुप्त मतदानाऐवजी आता आवाजी मतदानाने ही निवडणूक पार पडणार आहे. ज्यावर भाजपने सुरुवातीपासून आक्षेप घेतला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी राज्य सरकारने नियमात बदल केला असल्याची चर्चा आहे.

जर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांना आमदार फोडण्यात यश आलं असतं तर ठाकरे सरकार नक्कीच डळमळीत झालं असतं. या सगळ्याचा विचार करुनच सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाची आता तरतूद केली आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडीचा चेंडू अद्यापही राज्यपालांच्याच कोर्टात!

विधानसभा अध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे जाणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत. पण या सगळ्यात भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतं आहे.

अशावेळी काँग्रेस हायकमांड या महत्त्वाच्या पदासाठी या चार जणांपैकी कोणाला पसंती देणार की ऐनवेळी एखाद्या वेगळ्याच नावाची घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT