
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता लॅण्डफॉल (जमिनीवर आल्यानंतर) झाल्यानंतर कमी झाली आहे. मात्र, याचा परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामानातील बदलांमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे महाराष्ट्रावरही परिणाम जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे.
आजही राज्यातील आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळाने भारताच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री पाऊल ठेवलं. त्यानंतर सोमवारी वादळाची तीव्रता कमी होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर दिसणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
आज (२८ सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.
रेड अलर्ट देण्यात आलेले आठ जिल्हे कोणते?
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.