ठाकरेंचं कौतुक, फडणवीस यांच्यावर निशाणा; संजय राऊतांनी विरोधकांचा घेतला समाचार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण होत असून, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या सत्ता स्थापनेच्या दाव्याचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर राऊत यांनी रोखठोक सदरातून निशाणा साधला आहे.

संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे, ती राज्यातील विरोधी पक्षाची. सरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात.”

“मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्या दोन वर्षांत सगळ्यांना पुरून उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही. ज्याला राजकारणात ‘बिलो द बेल्ट’ म्हटले जाते ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम आहे. विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय ती पहा”, असं म्हणत राऊतांनी भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांचा पाढाच वाचला आहे.

ADVERTISEMENT

1) भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप पुराव्याशिवाय करणे व फक्त धुरळा उडवणे. ते उद्योग आजही सुरूच आहेत.

ADVERTISEMENT

2) सुशांतसिंह राजपूतसारख्या प्रकरणांना राजकीय रंग देऊन ठाकरे कुटुंब व सरकारला बदनाम करणे. या प्रकरणात कारण नसताना सीबीआयला घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्ततेवर पहिला प्रहार विरोधी पक्षाने केला.

3) महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याची व खाकी वर्दीचे खच्चीकरण करण्याची एकही संधी विरोधी पक्षाने सोडली नाही.

4) महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात असे चित्र निर्माण केले व राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यावर चिखलफेक केली.

5) परमबीर सिंह यांना ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून फडणवीस सरकारच्याच काळात नेमण्यात आले. कल्याण-डोंबिवली-ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी परमबीर हे अथक परिश्रम घेत होते. इतर पक्षांची माणसे फोडून त्यांचा भाजपत प्रवेश व्हावा यासाठी ते त्या काळात घेत असलेले कष्ट काय होते ते एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी सांगतील. तेच परमबीर पुढे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. (राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक म्हणूनही त्यांना फडणवीस सरकारनेच नेमले.) सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणात हे महाशय सहज फरारी झाले. परमबीर यांनी राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप केले. त्यामागचे बोलवते धनी कोण हे स्पष्ट झाले आहे.

6) फरारी परमबीर यांच्या आरोपांवर अनिल देशमुख यांना ‘ईडी’ने तुरुंगात टाकले. एकनाथ खडसे यांचे जावईदेखील अटकेत आहेत.

7) शिवसेनेचे आमदार, खासदार यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमकाविण्यात येत आहे.

8) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना खोट्या प्रकरणात ईडीने तुरुंगात टाकले. या प्रकरणाचे सूत्रधार अधिकारी वानखेडे यांना विरोधी पक्षाने पाठबळ दिले.

9) आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे व शरद पवारांच्यावर खोटे आरोप केले. पवारांच्या आप्तांवर इन्कमटॅक्सच्या धाडी घातल्या.

10) महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळविण्यासाठी विरोधी पक्षाने घेतलेले कष्ट अवर्णनीय आहेत. अमरावतीत जातीय दंगे भडकवून वातावरणात तणाव निर्माण केला.

“हे सर्व प्रताप घडवूनही भाजपला सरकारवर साधा चरोटाही पाडता आला नाही. कारण भाजप जे करीत आहे ते राजकारण नसून वैफल्यातून फुटलेल्या कपट-कारस्थानांचे कोंब आहेत. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी जे कमावले ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावले. सत्ता हेच सर्वस्व असेच मानून त्यांची पावले पडत गेली व सत्ता गमावली या धक्क्यातून ते दोन वर्षांनंतरही सावरू शकले नाहीत.”

“महाराष्ट्रातील 45 आमदार फोडल्याशिवाय भाजपला सत्ता पलटविण्याचा डाव यशस्वी होणार नाही व ते आतापर्यंत एकही आमदार गळाला लावू शकलेले नाहीत. पंढरपूरची पोटनिवडणूक गफलतीमुळेच राष्ट्रवादी हरली व देगलूरच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी उभे केलेली तटबंदी भाजपस तोडता आली नाही. उत्तर गुजरातच्या सीमेवरील दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक जिंकून शिवसेना परतली. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. त्यात महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली आहे. दोन वर्षांत विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावली. कारण राष्ट्रीय स्तरावरही जनतेच्या हिताच्या कोणत्याही मुद्द्यावर भाजपने महाराष्ट्राचा आवाज उठवला नाही.”

“नोटाबंदी, कोरोना व्यवस्थापनातील अनागोंदी, तीन कृषी कायदे हे जणू ईश्वरी वरदानच आहे अशा थाटात ते वागले. नोटाबंदी फसली. तीन कृषी कायद्यांबाबत मोदी यांना माघार घ्यावी लागली. कोरोना काळात निर्माण केलेल्या ‘पीएम केअर फंडा’तील व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावर भाजपचे ऑडिटर जनरल किरीट सोमय्या बोलायला तयार नाहीत. हे ढोंग आहे. त्या ढोंगाचे वस्त्रहरण झालेच आहे,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

“ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत नेमके काय केले ते मी नंतर लिहीन, पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. लोकांत ते प्रिय आहेत. हा माणूस कारस्थानी नाही ही त्यांची ओळख बनली आहे. शरद पवार यांनी ठाकरे यांना काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे व सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही हस्तक्षेप नाही.”

“कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा राष्ट्रीय पातळीवरही सगळ्यांत आश्वासक चेहरा होता. हाच माणूस संकटातून रक्षण करेल हा विश्वास त्यांनी निर्माण केला. त्यांनी भव्य आरोग्य यंत्रणा उभी केली. लोकांना फॅमिली डॉक्टरप्रमाणे मार्गदर्शन केले. टीकेची पर्वा केली नाही. प्रसंगी कठोर वागले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले.”

“आजही महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य गणले जाते. याचे कारण इथे आजवर राजकीय स्थैर्य नांदत आले आहे. इथल्या कामगारांची उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत वरच्या दर्जाची आहे. जनताही तुलनेत सुशिक्षित व आधुनिक विचारांचा स्वीकार करणारी आहे. इथली शासकीय यंत्रणा कार्यक्षम आहे आणि तिचा दृष्टिकोन आधुनिक व विकासोन्मुख आहे. ही सर्व व्यवस्था सरकारे आली व गेली तरी कायम असते. ती तशीच राहायला हवी. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हे सर्व मोडून पडेल असे वागणे सोडायला हवे. फडणवीसांचे पहाटेचे राजकारण 72 तासांत आटोपले. त्यास दोन वर्षे झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सोहळ्याला दोन वर्षे होत आहेत. कोणी काय कमावले व गमावले यापेक्षा राज्य किती पुढे गेले ते महत्त्वाचे!”, असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीवर भाष्य केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT