
सातारा: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांची उद्घाटने केली होती. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत 'नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती.' असे म्हटलं होते. ज्याला आता उदयनराजे यांनी आज (14 ऑक्टोबर) किल्ले प्रतापगड येथे प्रत्युत्तर दिले आहे.
पाहा उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले:
'शिवेंद्रराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, 'मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो. मी चालत ही जाईन, रांगतही जाईल... वाटले तर लोळतही जाईन. नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडत ही जाईल, सीटवर उभा राहून जाईल.. नाहीतर डोक्यावर चालत जाईल, तुम्हाला काय करायचेय?'
'कोणाला याबद्दल दु:ख वाटत असेल तर तुम्हाला कोणी थांबवलं? तुम्हीही करा तसं.. लोकशाही आहे. जनतेला कामं पाहिजे. नाव ठेवायला काय अक्कल लागत नाही. याचा अर्थ मला खूप आहे अशातला भाग नाही. पण कॉमन सेन्स आहे. त्यामुळे काम करा आणि समोरासमोर बोलवा.' असं म्हणत उदयनराजे यांनी आपल्याच पक्षातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे.
मागील 5 वर्षात सातारा नगरपालिकेची सत्ता खासदार उदयनराजे भोसलेंकडे असताना देखील ते विकास कामं करण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच आता बाइकवरुन फिरून नौटंकी सुरु केली आहे. अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती.
सातारा नगरपालिकेत सध्या उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पण गेल्या पाच वर्षात या विकास आघाडीने आणि खासदारांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत असा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला आहे. ज्यानंतर साताऱ्यातील दोन्ही राजेंमध्ये आता वाद निर्माण झाला आहे.
टोलनाके कोण चालवतं हे सर्वांना माहीत, शिवेंद्रराजेंचा पुन्हा उदयनराजेंवर निशाणा
सध्या सातारा नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागलं आहे. त्यामुळेच आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आरोपावर आमदार शिवेंद्रराजे यांनीही पुन्हा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
'सातारा नगरपालिकेत गेली 4.5 वर्षे झाली कोणतीही काम दिसत नाहीत. पालिकेत सर्व भ्रष्टाचार बोकळला आहे. सत्ताधारीचे नगरसेवक एकमेकांवर आरोप करत आहेत. सातारा विकास आघाडीने मागील 4 वर्षात काय केले? हे मला विचारण्याचा अधिकार आहे.'
'रविवारी उदयनराजेंचा युवकांना बरोबर संवाद आहे. नेमका हा संवाद निवडणुकीच्या आधीच का सुचला, पाच वर्षे नेमकं उदयनराजेंनी काय केले.. 5 वर्ष युवक नव्हते का?'
'पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरचे सातारा हद्दीतील टोलनाके कोण चालवतं हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही खासदार असूनही मग या रस्त्याची अवस्था अशी का?' असा सवालही शिवेंद्रराजे यांनी केला आहे.