औरंगाबादच्या किर्ती मोटे हत्या प्रकरणाची तुलना सैराट सिनेमाच्या शेवटाशी का केली जाते आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इसरार चिश्ती/ पंकज खेळकर, प्रतिनिधी

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात असलेल्या गोयेगावमध्ये रविवारी जी घटना घडली त्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत प्रेमविवाह केलेल्या किर्ती मोटे या तरूणीची तिच्या भावाने आणि आईने कोयत्याचे वार करून हत्या केली. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र सून्न झाला आहे. अशात ही घटना कशी घडली ते मुंबई तकने जाणून घेतलं आहे. सैराट सिनेमातल्या शेवटाची तुलना या घटनेशी नेमकी का केली जाते आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

या घटनेतलं क्रौर्य खूप भयंकर आहे, माणुसकीला काळीमा हा शब्दही कोता पडावा अशी ही घटना आहे. सख्ख्या भावाने अल्पवयीन मुलीला कोयत्याचे वार करून ठार केलं. त्यानंतर तिचं मुंडकं हातात घेऊन तो व्हरंड्यात आला. तिथे त्याने त्याच्या आईने त्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला. त्यानंतर तो भाऊ तिच्या सासरच्यांना ओरडून म्हणाला बघा मी हिचं काय केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किर्ती मोटे हत्याकांड : वडिलांनी किर्तीला घेऊन दिली होती बुलेट, ऑनर किलिंगचा आणखी एक ‘सैराट’ अँगल समोर

महाराष्ट्रातल्या औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी ही ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन भावाने त्याच्या सख्ख्या बहिणीला कोयत्याचे वार करून ठार केलं. किर्ती तिच्या भावापेक्षा मोठी होती. तिने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्याचाच राग मनात ठेवून तिची हत्या करण्यात आली. भावाने आणि आईने मिळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचं मुंडकं व्हरंड्यात आणून ठेवलं.

ADVERTISEMENT

मुंबई तकची टीम जेव्हा या गावात पोहचली तेव्हा या गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती. ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी रक्ताचे सुकलेले डाग घटना किती भयंकर होती त्याची साक्ष देत होते. मुलीच्या घरी जेव्हा मुंबई तकची टीम पोहचली तेव्हा तिच्या माहेरी म्हणजेच तिच्या आई वडिलांच्या घराला कुलुप होतं. तिचे वडील ही घटना झाल्यापासून फरार झाले आहेत. पोलिसांनी मुलीच्या आईला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर लहान भावाला ज्युवेनाईल कोठडीत पाठवलं आहे. आम्ही या मुलीच्या आई वडिलांच्या घराशेजारी चौकशी केली असता त्या शेजाऱ्यांचं हे म्हणणं होतं की जे घडलं ते अशा रितीने घडेल यावर आमचा विश्वासच बसत नाही. ही माणसं तशी वाटत नव्हती. मात्र गावकऱ्यांनी आणखी काही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोटे आणि थोरे परिवार यांच्यात खानदानी वाद विवाद आहेत. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये लग्न होत नाहीत. मात्र कॅमेरासमोर हे वक्तव्य कुणीही केलेलं नाही.

किशोरी मोटे (किर्ती) आणि अविनाश थोरे या दोघांची प्रेमकहाणी सैराट सिनेमासारखीच आहे. अविनाश संजय थोरेने आम्हाला सांगितलं की आम्ही दोघं कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनच शेजारी शेजारी असलेल्या गावांमध्ये आम्ही रहात होतो. दोन्ही गावांमधलं अंतर 2-3 किमी पेक्षा जास्त नाही. किशोरी अकरावीत होती आणि अविनाश बारावीत होता. तेव्हापासून दोघं एकाच बसने कॉलेजला जायचे. तिथेच त्यांची ओळख झाली. सुरूवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर काही दिवसांनी किशोरीला तिच्या वडिलांनी बुलेट घेऊन दिली होती. ती या बुलेटवरून कॉलेजमध्ये ये-जा करू लागली होती. या काळात या दोघांचं प्रेम बहरलं. दोघांचं प्रेमप्रकरण सुमारे दोन ते अडीच वर्षे सुरू होतं.

औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

जेव्हा किशोरीच्या घरातल्यांना तिच्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तिचं कॉलेजात येणं जाणं बंद करून टाकलं आणि तिला घरी बसवलं. काही दिवसांनी किशोरी आणि अविनाश यांनी ठरवलं की पळून जायचं त्यानुसार 21 जून 2021 ला दोघं आपल्या घरांमधून पळून गेले तिथून त्यांनी पुण्याजवळचं आनंदी गाव गाठलं आणि तिथे लग्न केलं. लग्न केल्यानंतर एक महिन्यानी हे दोघे आपल्या गावी परतले. अविनाशची चार एकर शेती आहे. या शेतात दोघंही काम करत होते आणि आपला चरितार्थ चालवत होते. दोघांच्याही सुखी संसाराला सुरूवात झाली होती.

अविनाश थोरेने सांगितलं आमच्या लग्नानंतर काही महिने गेल्यावर किशोरीची आई आमच्या घरी आली. त्यावेळी तिला किशोरीने चहा करून दिला. तिथे या दोघींच्या चांगल्या गप्पाही झाल्या. आम्हाला वाटलं चला सगळं सुरळीत झालं. त्यानंतर रविवारी म्हणजेच आई भेटून गेल्यानंतर आठवडाभराने पुन्हा एकदा किशोरीची आई आणि तिचा लहान भाऊ हे दोघेही किशोरीला भेटायला आले. या दोघांना बघून किशोरीला खूप आनंद झाला. किशोरी या दोघांसाठी चहा करायचा म्हणून स्वयंपाक घरात गेली. त्याचवेळी तिच्या भावाने सोबत लपवून आणलेला कोयता काढला आणि किशोरीवर त्याने हल्ला केला. मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी झोपलो होतो. किशोरीवर हल्ला झाला तेव्हा काहीतरी पडल्याचा आवाज मला आला, म्हणून मी स्वयंपाक घरात गेलो. त्यावेळी मी पाहिलं ते थरकाप उडवणारं होतं.

औरंगाबाद: ‘भावाने तिच्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला आणि…’ किर्तीच्या नवऱ्याने सांगितली थरकाप उडवणारी घटना

किशोरीच्या आईने तिचे हात-पाय पकडून ठेवले होते आणि तिचा भाऊ तिच्यावर कोयत्याने वार करत होता. किशोरीच्या मानेवर त्याने कोयता चालवला. मला पाहून त्याने माझ्यावरही कोयता उगारला जे पाहून मी तिथून पळून गेलो आणि आपल्या नातेवाईकांना आरडाओरडा करून बोलावू लागलो. माझे नातेवाईक काय झालं ते बघायला आले त्याचवेळी तिचा भाऊ तिचं मुंडकं घेऊन आला त्याने आणि त्याच्या आईने त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि मग त्याने किशोरीचं मुंडकं व्हरंड्यात भिरकावून दिलं. माझी काकू, आजी सुनेचं मुंडकं पाहून खूप घाबरून गेल्या. त्यांनी कसंतरी माझ्या आईला फोन करून हे सगळं सांगितलं माझी आई त्यावेळी घरी नव्हती.

अविनाशच्या काकूने आणि आजीने सांगितलं की या दोघांचा अविनाश आणि किशोरी संसार खूप चांगला चालला होता. किशोरीचा स्वभाव खूप चांगला होता ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून आणि खेळीमेळीने राहात होती. ज्यावेळी किशोरीच्या भावाने तिचं मुंडकं कापून व्हरंड्यात आणलं तेव्हा आम्ही खूप घाबरलो. तिची आई आणि भाऊ असं काही करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं.

किशोरीच्या आई वडिलांच्या घरी जेव्हा आमची टीम गेली तेव्हा आम्ही पाहिलं की शेतातल्या त्या घराला कुलुप लावण्यात आलं आहे. मोटे परिवाराबाबत सगळेच शेजारी मौन बाळगून होते. मोटे कुटुंबाची पाच एकर शेती आहे. लहान भावाने शाळा सोडून दिली होती आणि तो शेतीच करत होता. सकाळी शेतात काम करायचं आणि रात्री घरी जायचं असाच त्यांचा दिनक्रम होता असं काही जणांनी सांगितलं मोटे कुटुंबीय सगळ्यांशी चांगलं वागत असायचं असंही काही शेजाऱ्यांनी मुंबई तकच्या टीमला सांगितलं. तसंच किशोरीचा भाऊ आणि आई असं काही कृत्य करतील यावर विश्वास बसत नाही असंही काही जणांनी सांगितलं.

सैराट सिनेमाशी तुलना का केली जाते आहे?

सैराट सिनेमाचा शेवटही असाच होतो. सैराट सिनेमात आर्ची आणि परशा हे पळून जाऊन घरातल्यांच्या विरोधाला पत्करत लग्न करतात. हैदराबादमध्ये दोघं राहात असतात. दोघांना मूलही होतं. त्यानंतर आर्चीचा पत्ता तिच्या भावाला म्हणजेच प्रिन्सला मिळतो. प्रिन्स आला आहे हे पाहून आर्चीला आनंद होतो. परशाही प्रिन्स आणि त्याच्या मित्रांचं स्वागत करतो. त्यांचा मुलगा शेजारी असतो, तो घरात जातो तेव्हा नुकतंच चालता येणाऱ्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई वडील म्हणजेच आर्ची आणि परशा दिसतात. ऑनर किलिंग याच विषयावर आधारलेला हा सिनेमा होता. या सिनेमाची चर्चा देशभरात झाली. आता औरंगाबादच्या घटनेतही या सिनेमाच्या शेवटाशी साधर्म्य साधणारे प्रसंग आहेत म्हणून या घटनेची तुलना सैराटशी केली जाते आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT