धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार; पाच हजार कोटींची बोली लावली अन् जिंकली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी उद्योग समूहामार्फत करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं नव्यानं काढलेली धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा तब्बल पाच हजार कोटींची बोली लावत अदानी समुहानं जिंकली आहे. स्पर्धेत असलेल्या डीएलएफ कंपनीनं दोन हजार कोटींची बोली लावली होती, तर नमन समुहाला तांत्रिक मुद्द्यावरुन बाद करण्यात आलं. याबाबत अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून खाजगी भागीदारीत धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र मागच्या 15 वर्षांमध्ये 4 वेळा हे प्रयत्न अयशस्वी झाले होते. अखेर गत ऑक्टोबर महिन्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुन्हा एकदा जागतिक निविदा काढण्यात आली. 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या बोलीपूर्व बैठकीमध्ये भारत, संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण कोरिया या देशांमधील 8 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र अंतिम क्षणी 5 कंपन्यांनी माघार घेतली तर 3 कंपन्यांनी बोली लावली. हीच निविदा आता अदानी उद्योग समूहाने जिंकली आहे. येत्या 17 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आणि पुढील 7 वर्षांत संपूर्ण पुनर्वसन करण्याचे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमुख एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की, अदानी समुहाने निविदेत 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर, डीएलएफने 2,025 कोटी रुपयांची बोली लावली होती. तिसरी कंपनी नमन समूह ही तांत्रिक निविदेत बाद झाली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतील मोक्याची जागा!

जवळपास 300 एकरांमध्ये पसरलेल्या धारावीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. यात साधारणपणे 10 लाख नागरिकांचं वास्तव्य आहे. चामडे, पादत्राणे आणि कपडे तयार करणाऱ्या अनेक लहान-मोठ्या, असंघटित उद्योगांचे केंद्र म्हणून देखील धारावीला ओळखलं जातं. धारावीपासून जवळचं वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दक्षिण मुंबईचा परिसर असल्याने या परिसराला मुंबईतील मोक्याची जागा म्हणून ओळखलं जातं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT