
महाराष्ट्र विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. आज अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यात शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव करत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. राजन साळवी यांना १०७ मतं पडली तर राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानतंर अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला गेला. त्यावेळी अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी करत भाषण केलं.
काय म्हटलं आहे अजितदादांनी?
आमचं सरकार पडल्यानंतर आम्हाला हे वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी तर रडायला लागली. गिरीश महाजन यांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचा पाणी पुसायला तो त्यांनी वापरला. भाजपच्या आमदारांनीच सांगावं हे कसं काय झालं?
एकनाथ शिंदे यांनी मला जर कानात सांगितलं की अडीच वर्षे झाली आहेत आता मला मुख्यमंत्रीपदावर बसायचं आहे तर मी उद्धव ठाकरेंशी बोलून तुम्हाला तिथे बसवलं असतं. अजित पवारांनी हे वाक्य उच्चारताच एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले आता मी समोर पाहिलं की मला मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडचे लोक जास्त दिसतात. त्यामुळे मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या रांगेत आहेत. आमच्याकडून निवडून गेलेले दीपक केसरकर हे तर एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं कुठे वायागा गेलं नाही हे दिसतंय असाही टोला अजित पवारांनी लगावला.
अजित पवार राहुल नार्वेकरांबाबत म्हणाले की ते ज्या पक्षात जातात तिथल्या नेतृत्वाला आपलंसं करतात. शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरेंना त्यांनी आपलंस केलं. आमच्याकडे आल्यानंतर मला आपलंसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं. आता एकनाथ शिंदे तुम्ही राहुल नार्वेकरांना आपलंसं करा नाही तर काही खरं नाही तुमचं असंही अजित पवार म्हणाले. राहुल नार्वेकर हे आमचे जावई आहेत. आत्तापर्यंत आम्ही जावयाचे हट्ट पुरवत आलो आहोत आता त्यांनी म्हणजेच जावयांनी आमचा हट्ट पुरवला पाहिजे. अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर अजित पवारांनी जे भाषण केलं त्याची चर्चा चांगलीच रंगली होती.