Ajit Pawar : “चंद्रकांत पाटलांना आम्ही म्हटलं भिकारड्यासारखं बोलतात तर मग..”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती

चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. आजच पिंपरीत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. तसंच बारामतीत बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. आम्ही तुम्हाला असं बोललं तर चालेल का? असा खडा सवाल अजित पवारांनी केला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

भाजपचे लोक सारखं काही ना काहीतरी चुकीचं बोलत आहेत. त्याविरोधात १७ डिसेंबरला आम्ही मोर्चा काढला आहे. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही सगळे बसलो आणि हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काय वेड लागलं आहे का? महाराष्ट्रातल्या महापुरूषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, आम्ही त्यांच्या विचारांनी पुढे चाललो आहे. असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील यांच्याबाबत काय म्हटले अजितदादा?

हे काय सांगतात? महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा काढल्या त्यासाठी भीक मागितली. अरे कुणी सांगितलं तुला भीक मागितली? आम्ही म्हटलं की भिकारड्यासारखा बोलतो तर काय वाटेल? आम्ही म्हणणार नाही. इतरांना काय बोलता येत नाही का? आरे ला कारे? हे आम्हालाही करता येतं. भ ची भाषा तर आम्हाला खूप चांगली जमते. पण आम्हाला तसं बोलायचं नाही आणि वागायचं नाही. ती आमची संस्कृती नाही आणि वडिलधाऱ्यांचे संस्कार नाहीत. हे मात्र भीक मागून केलं म्हणणार. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली नसती तर बहुजनांचे मुलं-मुली कुठे गेले असते? मूठभर लोकांच्या हातात शिक्षणाचे अधिकार होते. शिक्षणाची कवाडं उघडण्याचं काम हे या महापुरूषांनी केलं. त्यांना तुम्ही भीक मागितली म्हणता? यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत चंद्रकांत दादांना कोण भिकेला लागतंय हे दाखवयाची वेळ आली आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत पुण्यातल्या पिंपरीमध्ये त्यांच्यावर एका अज्ञाताने शाईफेक केली. हा समता परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी, औरंगाबाद येथे एका कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात निषेध सुरू झाला आहे. आज अजित पवार यांनीही त्यांचा खरपूस समाचार घेतला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT