
औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी इतिहासातील सर्वात मोठे बंड केले आहे. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आसपास असलेल्या नेत्यांवर आरोप केले होते, त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केले होते. आता संजय शिरसाठांच्या पत्राला एका शिवसैनिकाने खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबादचे युवासेना शहर चिटणीस किरण लखनानी यांनी संजय शिरसाट यांना पत्र (Sanjay Shirsat Letter) लिहिले आहे.
काय आहे पत्रात?
प्रति ,
संजयजी शिरसाठ
आमदार (संभाजीनगर पच्छिम)
आमचे दैवत हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वंदन करुण पत्र लिहतोय
पत्रास कारण की
आत्ताच समाज माध्यमाद्वारे तुम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना उद्देशुन लिहिलेले पत्र पाहिले , पन ते आपन लिहले की आपणास कोणी लिहण्यास भाग पाडले हा सामान्य शिवसैनिकांना पडलेला प्रश्न होय ..? कारण आपल्यावर कोणता अन्याय झाला तेच समजत नाही २००९ पासून २०१९ पर्यंत आपन शिवसेनेच्या कृपेने आमदार आहात एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी टिकिट देवून निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि आपन मतदार संघातील सामान्य शिवसैनिकांच्या महेनतिच्या बळावर आमदार झालात ,
होय याचे संपूर्ण श्रेय हे सामान्य शिवसैनिकांनाच जाते...
खर तर नवलच वाटते ऐकून शिवसेनेने भाजपा सोबत युती करा अस म्हणत तुम्ही व तुमच्या गटाने बंड पुकारला म्हणे , पन आज तुम्ही ज्यांच्या बळावर गट तयार केला त्या तुमच्या गटा मधील लोकांना तुम्ही सांगितले नाही आहे .? की २०१९ ला शिवसेना - भाजपा युती असून सुद्धा तुमच्या विरोधात भाजपा ने अपक्ष उमेदवार उभा केला होता व पूर्ण ताकद लावून बंडखोर उमेदवारास रसद पुरवली होती तसेच पूर्ण भाजपा ने तुमच्या विरोधात काम केले होते हे विसरले का आणि ही बाब फक्त तुमच्याच बाबतीत नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मतदार संघात हे घडले यामुळे अनेक उमेदवार पराभूत झाले व काही आमदार थोडक्यात बचावले व काठावर निवडून आले याची जाणीव असु द्या...
तुम्ही आमदार व्हावा म्हणून शिवसैनिकांनी रात्र दिवस मेहनत घेतली , भाजपा सारखे बेईमान झालो असतो तर तुमच्या जागी आज भाजपाचा आमदार असता हे लक्षात असु दया , आपन व आपले गट जे काही करताय ते शिवसैनिकांना अत्यंत वेदनादाई आहे पन यातून शिवसैनिक खचेल असा आपला समज असेल तर ते खुप चुकीचा आहे एक लक्षात ठेवा पुढील वेळी आपल्या शिवाय संभाजीनगर पच्छिम मतदार संघात शिवसेनेचा शिलेदार मोठ्या मताधिक्याने निवडणून येईल ही काळ्या दगडा वरील भगवी रेघ..
तुम्हाला तुमच्या सोबत गद्दारी करणारे भाजपा वाले आज शिवसैनिकांपेक्षा महत्वाचे झाले आपल्या कृती मधून ते स्पष्ठ समजते
असो याने शिवसैनिक खचून जाणार नाही , तर बंड करणाऱ्याच्या छाताडावर पुढील निवडणूकी मधे भगवा रोवल्या जाईल हे लक्षात असु द्या..!
जय महाराष्ट्र...!!!
अशा आशयाचे पत्र शिवसैनिकानी संजय शिरसाट यांना लिहिले आहे.