“…तर महाराष्ट्राच्या दोन्ही मंत्र्यांवर कारवाई करणार” : कर्नाटक पोलिसांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकांनंतर दोन्ही राज्यांच्या प्रमुख नेत्यांकडून याबाबत विधान करण्यात आली. बेळगाव, कारवार, निपाणीसह ८०० गावांचा सीमाप्रश्न अद्यापही प्रलंबित असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट जत आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला. या दाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं. या दाव्या-प्रतिदाव्यामुळे सीमाभागातील वातावरण तणावग्रस्त बनलं आहे.

अशात महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या निमंत्रणावरुन सीमा समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगावच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा दौरा होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी हा दौरा ३ डिसेंबरला नियोजीत होता. मात्र ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी आता हा दौरा ६ डिसेंबरला होणार आहे.

कर्नाटक पोलिसांचा मंत्र्यांना इशारा :

महाराष्ट्रातील मंत्री बेळगांवमध्येच पोहचण्यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांना आणि मराठी संघटनांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मंत्री विवाहासाठी, कोणाच्या घरी भोजनासाठी किंवा चर्चेसाठी बेळगावमध्ये येत असतील तर आम्ही काही करू शकत नाही; पण त्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला किंवा त्यांनी तसा प्रयत्न जरी केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, कर्नाटकमध्ये या दोन्ही मंत्र्यांच्या दौऱ्याला कन्नड संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. दौऱ्यावर बंदीची मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अलोक कुमार यांनी वरील वक्तव्य केलं. कर्नाटकात विविध कारणांसाठी कोणीही येते, पण गोंधळ घालण्यासाठी कोणी आले तर मात्र कारवाई केली जाईल. महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याकडे पोलिसांचे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

असा असणार दौरा :

या दौऱ्यात मंत्री पाटील आणि मंत्री देसाई महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. तसंच हुतात्मा स्मारक येथे जाऊन सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. शिवाय या हुतात्म्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT