
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदयनराजे आज दिल्लीत पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी करणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अवमानकारकविधाने केल्यानंतर छत्रपतींचे वशंज निर्णय घेतला. असलेले उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. निर्धार शिवसन्मानाचा अशी परिषद घेऊन त्यांनी पुण्यात शिवप्रेमींना एकत्र केले. तर रायगडावर आक्रोश आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. उदयनराजेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली.
राष्ट्रपतींनी उदयनराजेंची ही तक्रार केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवली. तरीही अद्याप राज्यपालांबाबत निर्णय होत नसल्याने खा. उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा निर्णय घेतला
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता मोदींनी उदयनराजेंना भेटीची वेळ दिली आहे. या भेटीत उदयनराजे गुजरातच्या विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन करणार आहेत. राज्यपालांबाबत तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या वातावरणावर तोडगा काढण्याची मागणी उदयनराजे मोदींकडे करणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे राज्याचे लक्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर स्वस्थ बसणार नाही. माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी पक्षीय कारवाईला देखील घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. राज्यपालांचे कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, महाराजांचे नाव घेऊ नये, असा आक्रमक पवित्रा उदयनराजेंनी घेतला.
प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं. मला खात्री आहे राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा. माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं.