
औरंगाबाद: 'टिनपाट प्रवक्त्यांमुळे माझ्या देशाच्या पंतप्रधानचा फोटो कचराकुंडीवर लागला.' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरुन आपला संताप व्यक्त केला. एवढंच नव्हे तर त्यांनी यावेळी भाजपवर देखील जोरदार टीका केली.
पाहा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:
'भाजपने त्यांचे जे काही बेलगाम सुटलेले प्रवक्ते आहेत त्याच्या डोक्यात जर का मेंदू असेल तर त्यात काही तरी अक्कल घातली पाहिजे पहिले. इतकी वर्ष शिवसेनाप्रमुखांचे विचार तुम्ही ऐकत आला आहात.. कधीही शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा द्वेष करा. त्यांना तोडा-फोडा हे आपल्याला कधी सांगितलंय?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
'जे शिवाजी महाराज कुराण सापडल्यानंतरही त्याचा मान ठेवत होते ते संस्कार आमच्यावर झाले आहेत. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. अनेकदा शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेलं आहे की, प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवायचा.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
'भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध काय तुमचा.. आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही तसा त्यांच्या देवांचा अपमान करण्याचा तुम्हाला काही गरज नाही. पण तो अपमान केल्यानंतर सगळे अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावर आणलं. त्यांनी आपल्या माफी मागायला लावली.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
'राजकारण वेगळं.. राजकीय मतभेद असतील.. नव्हे ते आहेतच.. पण ते माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो कचराकुंडीवर लावला जातो आणि हे आम्ही नुसतं बघत बसायचं? कोणामुळे ही परिस्थिती आली आहे.'
'भारताने माफी मागायची.. काय देशाने काय केलंय.. गुन्हा केलाय तो भाजपने केला आहे. गुन्हा केलाय तो भाजपच्या टीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपचा प्रवक्ता हा काही देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपची भूमिका ही काही देशाची भूमिका होऊ शकत नाही.' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.
'तुम्ही तुमच्या भूमिकेने जा पुढे. आज तुम्हाला जाहीरपणे विचारतोय की, भाजपच्या ज्या टीनपाट प्रवक्त्यामुळे देशावर जी नामुष्की ओढावली हे तुम्हाला मान्य आहे का?'
'आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावण्यात आला या एका व्यक्तीमुळे हे तुम्हाला पटतंय. या अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि तुमच्या मागे आम्ही फरफटत यावं ही जर का तुमची भूमिका असेल तर हे सोडून द्या. हे कदापी शक्य नाही.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.