ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सहा महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर टाकलं आहे. आपल्याला मैदानच पुरत नाहीत एवढी आपली ताकद वाढत चालली आहे. तुळजाभवानीचं रूप मला आज या सगळ्या जनतेमध्ये पाहतो आहे.
ही सभा बघत असताना बातम्या चालत होत्या. आज उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. ढेकणांना आम्ही असेच चिरडत असतो. त्यासाठी तोफ वाया घालवायची नाही. हिंदुत्व हा आपला श्वास आहे. संभाजी नगरच्या पाणी प्रश्नावर मी आज बोलणार आहे. मी जनतेला सामोरा जातो आहे. मला कुणाला फसवेगिरी करायची नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.
समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन केलं होतं. त्या योजनेचा पाठपुरावा मी स्वतः करेन हे वचन दिलं आहे. या योजनेत जे कुणी येतील त्यांना दंडा घेऊन सरळ करणार आहे. १० दिवसाआड येणारं पाणी आता सुधारतं आहे. इथला पाणी प्रश्न सोडवायचाच आहे. ते माझ्यापुढचं लक्ष्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. समांतर पाणी योजना पूर्ण करण्याचे आणि महापालिकेला पाण्यासाठी पैसे देण्याचं मंजूर केलं आहे.
मधे कुणीतरी जन आक्रोश की जल आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजी नगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता तो सत्ता गेली म्हणून केला. खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही. आंदोलन करणाऱ्यांनी पाच वर्षे सत्ता होती तेव्हा काय केलं? संभाजीनगरचा विकास करत आहोत. अनेक गोष्टी घडत आहेत.
आपल्याकडे मेट्रो करायची आहे, मात्र शहराचं विद्रुपीकरण करून ते करणार नाही. जे विकास काम आम्ही करू ते संभाजीनगरची शान वाढवणारी असेल यात शंका नाही. आज हे वचनच मी तुम्हाला संभाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या साथीने देतो आहे.
संभाजी नगर कधी करणार? संभाजी नगर कधी करणार? हे विरोधकांकडून बोललं जातं. ते माझ्या वडिलांनी दिलेलं वचन आहे. मी ते विसरलेलो नाही. विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. सुरूवात म्हणून विमानतळाचं नाव संभाजी नगर करा असं आम्ही केंद्राला सांगितलं आहे तो ठराव अजून केंद्राने मंजूर का केलेला नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. मी जेव्हा या शहराचं नाव संभाजी नगर करेन तेव्हा छत्रपती संभाजी राजांना अभिमान वाटेल असं संभाजी नगर घडवून दाखवेन असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नाव दिलं जाणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.