
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले,' अशी टीका पाटलांनी केली.
'भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे,' असं प्रत्युत्तर पाटलांनी दिलं.
'महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण उद्धव ठाकरे विसरले की, पेट्रोल डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून त्यांचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. असा दिलासा गुजरात आणि इतर राज्यांनी दिला आहे. स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे,' असं पाटील यांनी म्हटलं आहे.
'आपल्या सरकारमुळे मराठा समाजाचं असलेलं आरक्षण गेलं व ते पुन्हा मिळविण्यासाठी सरकार काहीच करत नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं. राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली. हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकऱ्यानं आत्महत्या केली. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी उल्लेखही केला नाही. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेनं केलेलं शाळांचं काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला,' असंही पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं ट्विट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. 'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम... अरे छट हा तर निघाला... आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा,' असं फडणवीसांनी ठाकरेंच्या भाषणावर म्हटलं आहे.