
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चौफेर टीका होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी देखील राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून राज्याच्या प्रथम नागरिकांनी असं स्टेटमेंट देऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह आता संभाजीराजेंनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याला चुकीचे असल्याचे सांगितले. राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी असे स्टेटमेंट द्यायला नको ज्याने महाराष्ट्राची सामाजिक रचना बिघडेल, असं संभाजीराजे म्हणाले. सोबतच राज्यपालांनी असे वक्तव्य टाळावीत, असं देखील संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.
"कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही" असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वादनिर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीन ट्विट करत एकनाथ शिंदे सरकारला राज्यपालांच्या वक्तव्यावरून जाब विचारला आहे. यासाठीच शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार आणलं का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे सरकारला विचारला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते राज्याचा अपमान करणारं वक्तव्य आहे. राज्यपाल हे संवैधानिकपद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अशी वक्तव्यं राज्यपाल कोश्यारी यांनी करू नयेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदी सरकारला पत्र पाठवतील असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा व्हीडिओ ट्विट करत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.