
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केले यामध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पंकजा मुंडे यांना डावलले याचं मला दुःख आहे.' असं म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. डोंबिवली येथे एका नातेवाईकांच्या घरी आलेले असताना एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.
'पंकजाताईंना का डावललं?'
'मुंडे-महाजन खडसे या नावाने काही कालखंड भाजपाची ओळख होती. वर्षानुवर्ष अनेकांनी त्यात योगदान दिलं. अनेकाच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला. मुंडेसाहेब आमचे नेते होते त्यांनी यासाठी उभे आयुष्य खर्ची घातलं, त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला प्रामुख्याने पंकजा ताईंसारख्या ओबीसी नेतृत्वाला जिचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे तिला मानणारा वर्ग मोठा आहे अशा स्थितीत तिला डावलण्याचा काय कारण आहे? हे मी समजू शकलेलं नाही.' अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.
'अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही'
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता अपक्ष आमदारांवर विविध आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'मतदारावर विश्वास दाखवावा लागतो, मत दिलं की नाही दिलं हा अंदाज असू शकतो, मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य होत नाही. आमदारांवर जी जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी निश्चितपणे पार पाडलेली दिसतेय.'
'मी प्रतोद अनिल पाटील त्यांच्याशी चर्चा केली ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मला सांगितलं तिघांनी मतदान केलंय याची मला खात्री आहे. माझा विश्वास असल्याचे सांगितले. अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही.' असे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
'कुठल्याही प्रकारचा दगाफटका न होता ही निवडणूक जिंकायची त्या दृष्टीने प्रयत्न करणार'
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांनी उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत रणनिती काय असणार याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'पक्षाच्या वतीनं आमदारांच्या भेटीगाठींची आता सुरुवात सुरू होईल. राज्यसभेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता पक्ष आणि आम्ही सर्व मिळून अधिक काळजीपूर्वक या निवडणुकीकडे पाहत आहोत. कुठल्याही प्रकारचा दगाफटका न होता ही निवडणूक जिंकायची आणि या दृष्टीने सर्व मिळून प्रयत्न करायचे अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.