
मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने आपला तिसरा उमेदवार देखील निवडून आणला आहे. त्यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी खोचक ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेने एमआयएम पक्षाला सोबत घेतले अशी टीका मनसेकडून वारंवार करण्यात येत होती. परंतु इम्तीयाज जलील यांनी स्पष्ट सांगितले होते की आम्ही आमचे मत हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देणार आहोत. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे.
काल झालेल्या पराभवानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच मनसे आमदार राजू पाटील ट्विट करत म्हणाले ''औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली.''
''संजय राऊतांनी सांगितली फुटलेल्या आमदारांची नावं''
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणले की नक्कीच आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. काही बाजारातले घोडे विकले गेले, कदाचित त्यांच्यावर जास्त बोली लावली असेल. आम्हाल मतदान करणारे सहा आमदार फुटले. बहुजन विकास आघाडीचे तीन, श्यामसुदंर शिंदे, देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे यांनी आम्हाला मतदान केले नाही असे स्पष्ट संजय राऊतांनी सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले आमचा पराभव...
'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली.' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. आपल्यासाठी हा निकाल अनपेक्षित नव्हता. राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरेंनी ती रिस्क घेतली. असंही शरद पवार यावेळी म्हणाले.