युतीची किमया! कोकणातील कट्टर विरोधक राणे-केसरकर एकाच रॅलीत शेजारी-शेजारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाकडून ऋतुजा रमेश लटके यांनी अर्ज दाखल केला. तर माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पटेल यांनी अर्ज दाखल केला. या निमित्तानं राज्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीमध्ये राजकीय सामना बघायला मिळणार आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याला आणि त्यातही कोकणाला आज आणखी एक चमत्कारिक चित्र बघायला मिळालं. कोकणमधील कट्टर राजकीय विरोधक केसरकर आणि राणे हे दोघेही आज एकत्रित बघायला मिळाले. ते ही अगदी शेजारी-शेजारी. मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी आज शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते एकत्रित आले होते. यावेळी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर आणि भाजप आमदार नितेश राणे हे एकत्रित दिसून आले. दोघांमध्ये फारसा संवाद झाला नसला तरी दोघांनीही एकाच रॅलीत सहभाग घेत जवळपास ३ तास वेळ एकत्र घालविला.

सुखद धक्का का?

राणे-केसरकर वाद सिंधुदुर्गला नवीन नाही. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष असल्यापासून केसरकर आणि राणे यांच्यात राजकीय वैर होते. त्यानंतर 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेल्या केसरकर आणि राणेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समेट घडवून आणला. त्यामुळे केसरकरांचा विधानसभेतील पहिला विजय सुकर झाला. 2014 साली केसरकरांनी शिवसेनेत उडी घेतली आणि या वादाला आणखी खतपाणी मिळाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यापूर्वी केसरकरांनी राजकीय दहशतवाद असे म्हणत कायमच राणे यांना लक्ष्य केलेले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात केसरकर यांनी चांगलेच वातावरण तापवले. राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा कायम प्रचारात ठेवला आणि याचा फटका बसून राणेंचा पराभव झाला. या पराभवाचे शल्य आजही राणे अनेकदा जाहीररित्या बोलून दाखवितात. अलिकडेच शिंदे-भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतरही केसरकर-राणे वाद महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर राणेंवर टीका करणार नाही, अशी भूमिका केसरकरांनी घेतली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT