
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस सुरू झाली आहे. राज्यसभेसाठी जे उमेदवार देण्यात आले आहेत त्यावरुनच पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. याआधी पवनखेडा, नगमा, पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 10 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने तामिळनाडूमधून पी चिदंबरम, कर्नाटकातून जयराम रमेश, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, राजस्थानमधून प्रमोद तिवारी आणि महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
इम्रान प्रतापगढींवर हल्ला
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या कोट्यातून इम्रान प्रतापगढी यांना पाठवल्याबद्दल विश्वबंधू राय यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात विश्वबंधू यांनी म्हटले आहे की, दिल्लीत ठाण मांडून बसणाऱ्यांनाच मुख्य पदांवर नियुक्त केले जाते.
विश्वबंधूंनी आपल्या पत्रात इम्रान प्रतापगढी यांच्यावर उघड निशाणा साधला आहे. मुरादाबादमधून 6 लाख मतांनी पराभूत होऊनही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
त्यांनी असंही लिहिले आहे की, 'इमरान प्रतापगढी हे अगदी काही दिवसांपूर्वी पक्षात सामील झाले आहेत. मुरादाबाद लोकसभेची निवडणुकीत त्यांना जवळपास 6 लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंत ते एकाही महानगरपालिकेची निवडणूक जिंकू शकलेले नाहीत. तरीही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले होते. आता तर त्यांना राज्यसभेवर पाठवले जात आहे.'
'पक्ष एका व्यक्तीवर इतका मेहरबान का आहे?' असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. 'त्यांच्यात असा कोणता गुण आहे की, पक्षातील इतर लायक नेत्यांकडे दुर्लक्ष व्हावे?' असंही विश्वबंधू म्हणाले आहेत.
सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात विश्वबंधू यांनी पुढे लिहिले आहे की, 'पंजाबमध्ये नवज्योत सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवून अशीच चूक झाली होती. सिद्धूही इम्रानप्रमाणेच शेरोशायरी करत असे. अशा स्थितीत पक्षात पद मिळविण्यासाठी आता शायरीकडे वळणं आवश्यक आहे का?
काँग्रेसचे असेच नेते असेही महाविकास आघाडी सरकारमध्येही अपमानास्पदपणे पडून आहेत. आता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. असंही या पत्रात म्हटले आहे.
पवन खेडा यांनी नेमकी काय म्हटलं होतं?
राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपली नाराजी व्यक्त करणारे विश्वबंधू हे एकटे नाहीत. यापूर्वी पवन खेडा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की, 'कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी उणीव आहे.'
यानंतर अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी देखील पवन खेडा यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले की, 'आमची 18 वर्षांची तपश्चर्या इम्रान प्रतापगढीसमोर कमी पडली.'
या दोन्ही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तिकिटांच्या घोषणेवर फार काही वक्तव्य केलं नाही, मात्र, तिकीट वाटपात दुर्लक्ष झाल्याचा संदेश त्यांनी मोजक्याच शब्दातच दिला आहे.