
आज मुंबईतल्या बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं त्यांनी कौतुक केलं. जी वचनं आपण देतो ती पूर्ण करणं म्हणजेच आपलं हिंदुत्व आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसैनिक म्हणजे आमची कवचकुंडलं आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
येताना गर्दी बघत होतो, आल्यावरही गर्दी पाहिली. माझ्याकडे गर्दी पाहून शब्द नाही. ५० ते १०० बसेस भरून लोक आले आहेत. मला या सगळ्या जनतेमध्ये पंचमुखी हनुमान दिसले, महादेव शंकर दिसले, भगवान श्रीराम दिसले. आमचं कवच कुंडल आहेत हे सगळे शिवसैनिक म्हणजे. आपल्या सर्वांमध्ये माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी दिसली असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गेले होते. तिथल्या लोकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या आहेत. कोव्हिडच्या काळात आपलं कौतुक फक्त देशाने नाही तर जगाने केलं आहे. मास्क किती लोकांनी घातले? असाही प्रश्न विचारला पण लगेच आदित्य ठाकरेंनी उत्तरही दिलं आज आपल्याला मास्क उतरवून बोलायचं आहे. आपलं सरकार आल्यानंतर आपण पहिली घोषणा केली ती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची. ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबईतल्या बीकेसीमध्ये आपण कोव्हिड काळात १५ दिवसात हॉस्पिटल उभं केलं. दोन वर्षात आपण लॉकडाऊनही पाहिला. मात्र लॉकडाऊनचंही काटेकोर पालन आपल्याकडे करण्यात आलं. आजही सर्व्हे केला तेव्हा कळतं की मुख्यमंत्री हे आपल्या घरातले आहेत. मुख्यमंत्री जेव्हा वडिलधाऱ्या माणसाप्रमाणे महाराष्ट्राला मार्गदर्शन करत होते. लोकांनी ते कौतुक केलं. आपण एक स्वप्न पाहिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. देशातल्या टॉप फाईव्ह मधल्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत. सलग दोनदा येणारे तेच आहेत. हे कौतुक शिवसैनिक म्हणून नाही तर या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून करायचं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील किती तरी नावं घेता येतील कुठेही आम्ही थांबलो नाही. लसीकरण, कोव्हिड चाचण्या इतर अनेक गोष्टी आपण करून दाखवल्या. शाश्वत विकास आपण करून दाखवला असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.