
बाळासाहेबांच्या पाठीत जिवंतपणी ज्यांनी खंजीर खुपसला ते आज आम्हाला शिकवत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. पुण्यातल्या हडपसर या ठिकाणी झालेल्या सभेत आपल्या खास शैलीत भाषण करत संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
"आज लोकं पेटवापेटवीची भाषा करत आहेत. कोणी करायची पेटवापेटवीची भाषा? आमचं अख्खं आयुष्य पेटवापेटवीत गेलंय. सवाल ये नहीं की बस्तियाँ क्यू जली..सवाल ये है के बंदर के हातमें माचीस किसने दी? दोन दिवस पेटवत आहेत. आत्ता पेटेल, उद्या पेटेल, या कोपऱ्यात पेटेल, या गावात पेटेल असा प्रयत्न होतोय. काही पेटलं का? दारूगोळा शिवसेनेचा. कसं काय पेटणार? पेटण्यासाठी आतून आग असावी लागते. मनगटात धग असावी लागते. जी बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या मनात आणि मनगटात निर्माण केली. हातात माचीस दिली, सर्व काही दिलं काही पेटू शकलं नाही. पोलीस आले तेव्हा पेटवणारे पळून गेले."
"हा महाराष्ट्र आंड्यापांड्यांचा नाही, हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे. मला गंमत वाटते की आत्ताही भोंगा चालू आहे ना कुणाला त्रास होतो आहे का? लोकं ऐकत आहेत ना. गेले १५ वर्षे ज्यांना झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर भोंग्याचा त्रास का झाला? बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत जिवंतपणी ज्यांनी खंजीर खुपसला ते आज आम्हाला शिकवत आहेत. त्यांनी हे प्रयत्न करू नयेत." असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
सध्या महाराष्ट्रातलं राजकारण भोंग्यावरून चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याला त्यांनी मशिदींवरच्या भोंग्याचा मुद्दा बाहेर काढला होता. तसंच त्यानंतर त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. ४ मे रोजी काही ठिकाणी आंदोलनही झालं. आता त्यावरून राज ठाकरेंवर टीका होते आहे.
या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं सरकार हे सक्षम आहे.कोरोनापासून ते काही लोकांना झालेल्या पोटदुखीपर्यंत सगळे उपाय या सरकारकडे आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.