
आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा लढत होत आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होत असून, हा सामना बघण्यासाठी फक्त भारत-पाकिस्तानच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहते आतुर आहेत. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा विश्वास दुणावला आहे.
आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवल्या गेलेल्या आतापर्यंत सामन्याचा इतिहास बघितला, तर भारत पाकिस्तानवर भारी ठरलेला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ सामने खेळवले गेले आहेत.
१५ सामन्यांपैकी भारतीय संघाने ९ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानी संघाने ५ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिलेला आहे. त्यामुळेच भारत विजयी होण्याची आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारताला रवींद्र जाडेजाची उणीव जाणवू शकते. रवींद्र जाडेजा जायबंदी झाल्यानं आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागेवर अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं आहे.
यापूर्वीच्या पाकिस्तान विरुद्ध खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात डावखुरा फलंदाज म्हणून रवींद्र जाडेजाला वरच्या स्थानी बढती देण्यात आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही तोच फॉर्म्युला कायम ठेवणार का हे बघावं लागेल. त्यासाठी ऋषभ पंतला संघात घेणं हाच पर्याय रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर आहे.
१९८४ ते २०२२ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले सामने
१९८४ : भारताचा पाकिस्तानवर ८४ धावांनी विजय, शाहजाह
१९८८ : पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने ४ गडी राखून जिंकला, ढाका
१९९५ : भारताविरुद्ध पाकिस्तानचा ९७ धावांनी विजय, शारजाह
१९९७ : अनिर्णित
२००० : पाकिस्तानने ४४ धावांनी भारताचा पराभव केला, ढाका
२००४ : पाकिस्तानचा ५९ धावांनी विजय, कोलंबो
२००८ : भारताने ६ गडी राखून सामना जिंकला, कराची
२००८ : पाकिस्तानचा ८ गडी राखून विजय, कराची
२०१० : भारतीय संघाचा ३ गडी राखून विजय, दाम्बुला
२०१२ : भारताचा ६ गडी राखून पाकिस्तानवर विजय, मीरपूर
२०१४ : पाकिस्तानने १ गडी राखून भारताचा केला पराभव, मीरपूर
२०१६ : भारताने पाकिस्तान ५ गडी राखून मिळवला विजय, मीरपूर
२०१८ :पाकिस्तानविरुद्ध भारताने ८ गडी राखून मिळवला विजय, दुबई
२०१८ : भारताने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ९ गडी राखून मिळवला विजय, दुबई
२०२२ : भारताने ५ गडी राखून पाकिस्तानचा केला पराभव, दुबई
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात सलामीवर केएल राहुल पहिल्याचं चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे केएल राहुलकडून चांगल्या खेळीची राहुल द्रविड आणि संघाला अपेक्षा आहे.
दुबईतील खेळपट्ट्या संथ असल्यानं फलंदाजी करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भारतासमोर एक प्रश्न असणार आहे की, आवेश खानला अंतिम ११ खेळाडू स्थान द्यायचं की नाही. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात आवेश खान महागडा ठरला. त्यामुळे ऑफ स्पिनर अश्विनला संधी दिली जाऊ शकते.