
भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा दोन गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट-इंडिजच्या संघाने भारतासमोर बलाढ्या धावसंख्या उभारली होती. शाई होपने (Shai Hope) शानदार शतक झळकावले तर निकोलस पूरनने अर्धशतक झळकावून वेस्ट इंडिजला 311 धावांपर्यंत नेले.
होपने डावाची सुरुवात करत 135 चेंडूत 115 धावा केल्या तर पूरनने 77 चेंडूत 74 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक विकेट घेतल्या. ठाकूरने 7 षटकांत 54 धावा देत तीन बळी घेतले.
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, संघाला सुरवातील धक्के बसत गेले. भारतीय फलंदाजीमध्ये श्रेयस अय्यरने (63) आणि संजू सॅमसन (54) यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार अर्धशतके झळकावली. मात्र अक्षर पटेलने 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. विजयासाठी 312 धावांचा पाठलाग करताना भारताला 24 चेंडूत 32 धावांची गरज होती.
रोमारियो शेफर्डच्या चेंडूवर सलग दोन चौकार मारून अक्षरने 27 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात आवेश खाननेही चौकार मारला आणि भारताला 47व्या षटकात 13 धावा मिळाल्या. यानंतर अल्झारी जोसेफने 48व्या षटकात चार धावा दिल्या.
भारताने या सामन्याच्या विजयासह केवळ मालिकाच आपल्या नावावर केली नाही तर एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. ही मालिका जिंकून भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 12वी मालिका जिंकली आहे. आणि सर्वाधिक सलग मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम टीम इंडियाने आपल्या नावावर केला आहे. भारतापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. कारण पाकिस्तानी संघाने सलग 11 वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा पराभव केला आहे.
दरम्यान भारताने पहिला सामनाही सहज जिंकला होता. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या सामने खेळत आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. भारताने सध्या एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली आहे. पुढचा सामनाही जिकूंन भारतीय संघ विंडीजला व्हाईट वॅश देण्याच्या तयारीत आहे.