महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. अनेक शहरांमध्ये राज्य सरकारने निर्बंध कडक केले असून संचारबंदीचे नियम लागू केले आहेत. अमरावती, अकोला या शहरात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यामुळे लॉकडाउनही जाहीर करण्यात आलंय. अशा परिस्थितीत पुण्यात होणाऱ्या वन-डे सिरीजवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतू महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका प्रेक्षकांविना खेळवण्याची परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर, मुंबई क्रिकेट संघटनेच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलींद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत सामन्यांना परवानगी देण्याबद्दल चर्चा झाली. महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी प्रेक्षकांविना सामने खेळवण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुढील परवानग्यांसाठी प्रयत्न करणार आहे.
२३ ते २८ मार्चदरम्यान पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर ३ वन-डे सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अहमदाबादमध्ये आहे. ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये भारताने २-१ अशी आघाडी घेतली असून सिरीजमधला अखेरचा सामना आणि यानंतरचे ५ टी-२० सामनेही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावरच खेळवले जाणार आहेत.
अवश्य वाचा – IPL 2021 मुंबईबाहेर?? कोरोनामुळे BCCI पर्यायी जागांच्या शोधात