T-20 World Cup : पहिल्याच सामन्यात बांगलादेशला धक्का, स्कॉटलंडची ६ धावांनी सरशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीला रविवारपासून ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात क्रिकेटप्रेमींना मोठा उलटफेर पहायला मिळाला. ‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. स्कॉटलंडने अखेरपर्यंत झुंज देत ६ रन्सनी बाजी मारत पहिला विजय नोंदवला आहे.

टॉस जिंकून बांगलादेशचा कॅप्टन महमदुल्लाने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. स्कॉटलंडने २० षटकांत ९ गडी बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ७ बाद १३४ धावांपर्यंत पोहोचता आले. स्कॉटलंडकडून ख्रिस ग्रीव्ह्सने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. त्याने मार्क वॅट (२२) सोबत सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे खराब सुरुवातीनंतरही स्कॉटलंडचा संघ १४० धावांपर्यंतची मजल मारु शकला. बांगलादेशकडून मेहदी हसनने ३ तर शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी २ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सौम्या सरकार आणि लिटन दास हे दोन सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. यानंतर स्कॉटलंडच्या बॉलर्सनीही टिच्चून मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. मधल्या फळीत शाकीब अल हसन- मुश्फिकूर रहीम, मेहमदुल्ला, अफीफ हुसैन यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू सरतेशेवटी त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कर्णधार महमदुल्ला खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशला विजयाची आशा होती. पण १९व्या षटकात व्हीलने त्याला बाद करत स्कॉटलंडचा विजय निश्चित केला. स्कॉटलंड़कडून व्हीलने ३ तर ग्रीव्ह्जने २ बळी घेतले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT