'वंचितला म्हणाले दोनच जागा घ्या, फिक्सिंग तर..', आंबेडकरांचा मविआवर मोठा आरोप!

Prakash Ambedkar: मविआने वंचित बहुजन आघाडीला केवळ दोनच जागांची ऑफर दिली होती. पण याच लोकांचं भाजपसोबत फिक्सिंग आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी काल आहे.

मुंबई तक

• 11:59 PM • 11 Apr 2024

follow google news

गडचिरोली: 'फुले-शाहू चळवळीतील अति विद्वान आम्हाला म्हणतायेत की, दोन जागा घ्या.. आणि यांना मॅच फिक्सिंग करायला मोकळीक द्या. जे सल्ला देणार आहेत त्यांना सांगतो की, तुमची मॅच फिक्सिंग झाली आहे.' असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

'आज वेगवेगळा समूह वाचवा म्हणून रस्त्यावर उतरतो. मग मी या सगळ्या महान विद्वानांना विचारतो की, काँग्रेसने लालू यादवशी का फारकत घेतली? काँग्रेसने ममता बॅनर्जीशी का फारकत घेतली? याचं उत्तर आहे की, मागच्या निवडणुकीत वंचितने 65 लाख मतदान घेतलं आणि तुम्ही त्यांना म्हणतात दोनच जागा घ्या..' अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी गडचिरोलीच्या सभेत केली आहे. 

'काँग्रेसवाले भुरटे चोर, तर भाजपवाले डाकू आहेत...' 

'गल्लीतले गुंड जसे दादागिरी करत वसुली करतात तशाच प्रकारे पंतप्रधान मोदी गल्लीतल्या दादासारखं ईडी, सीबीआय यांना सोबत घेऊन हजारो कोटींची वसूली करत आहेत.' अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी गडचिरोलीच्या सभेत केली. 

'संधी आली असतानाही काँग्रेस यावर बोलत नाही. उद्धव ठाकरे का विचारत नाही? शरद पवार का विचारत नाही? त्यांच्या मागे ईडीचा भोंगा लावलेला आहे. काँग्रेसवाले भुरटे चोर, तर भाजपवाले डाकू आहेत...' 

'अवैध वसुली करत भाजपने स्वतःची संपत्ती वाढवली. भाजप-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत गेलो नाही. काँग्रेस अनेक गोष्टी भाजपला विचारत नाही. मग रस्त्यावर कसे लढणार. वंचितचा लढा सुरू राहील, रस्त्यावर लढू पण काँग्रेस सोबत जाणार नाही. आमची लढाई भाजप सोबत आहे.' असेही ते म्हणाले.

    follow whatsapp