आजपासून राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाचं अधिवेशन हे फक्त दोन दिवसांचं ठेवलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि ईडीची चौकशी या मुद्द्यावरुन विरोधक पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सामना मधील अग्रलेखातून आज शिवसनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
“अनिल देशमुखांपासून ते अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करत महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केलं तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही. भाजपचे ‘उपरे’ प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. ईडीने याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचें ठरवले असले तरीही राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाने त्यावर तात्काळ कारवाई करावी. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या या उद्योगांचीही भांडाफोड होणं गरजेचं आहे.”
विरोधी पक्ष कोणत्या मुद्द्यांवर आणि गुद्द्यांवर सरकारची कोंडी करणार आहे? त्यांनी ती जरुर करावी पण त्याआधी स्वतःच्या पार्श्वभागाखाली कोणत्या मुद्द्यांना मोड फुटलेत ते देखील पाहा असा इशारा शिवसनेने भाजपला दिला आहे.
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार मांडणार ‘ही’ विधेयकं
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन भाजपला सल्ला देताना अग्रलेखात, महाराष्ट्रात आज जे प्रश्न आहेत त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झाले आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षण हे विषय आता केंद्राने हाताळायचे आहेत व त्यावर निर्णय घ्यायचा आहे. या प्रश्नी विधानसभेत गोंधळ घालून काय होणार आहे? मराठा आरक्षणावरुन विरोधी पक्षाने सुरु केलेला बोभाटा हा बकवास आहे असंही शिवसेनेने म्हटलंय. त्यामुळे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT