अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक…; ‘सैराट’ त्यांच्या आयुष्यातच घडला!

मुंबई तक

• 12:37 PM • 08 Dec 2021

तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेपायी काही लोक पोटच्याच लेकरांनाचे कसे क्रूरपणे जीव घेतात, याची जाणीव करून देणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटासारखीच घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह करणाऱ्या किर्ती मोटे तरूणीची स्वप्न तिच्या भावाने आणि आईने एका क्षणात उद्ध्वस्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या गोयेगावमध्ये भरदुपारी हे क्रूर हत्याकांड घडलं आणि तेही अगदी सैराट चित्रपटातील अखेरच्या दृश्यासारखंच. सैराट सिनेमातील […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेपायी काही लोक पोटच्याच लेकरांनाचे कसे क्रूरपणे जीव घेतात, याची जाणीव करून देणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटासारखीच घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह करणाऱ्या किर्ती मोटे तरूणीची स्वप्न तिच्या भावाने आणि आईने एका क्षणात उद्ध्वस्त केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या गोयेगावमध्ये भरदुपारी हे क्रूर हत्याकांड घडलं आणि तेही अगदी सैराट चित्रपटातील अखेरच्या दृश्यासारखंच.

सैराट सिनेमातील आर्ची आणि परशासारखंच किशोरी मोटे (किर्ती) आणि अविनाश थोरे यांचं आय़ुष्यात घडलं. दोघांची प्रेमकहाणी ‘सैराट’सारखीच!

यात एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे अविनाश आणि किर्ती दोघं शेजारी-शेजारी असलेल्या गावात राहायचे. कॉलेजमध्ये असतानाच दोघांची ओळख झाली.

किर्ती अकरावीत होती आणि अविनाश बारावीच्या वर्गात शिकत होता. दोघांचं एकाच बसने कॉलेजला येणंजाणं असायचं. कॉलेज आणि प्रवासातच दोघं एकमेकांना ओळखायला लागले.

सुरूवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यातच काही दिवसांनी किर्तीला तिच्या वडिलांनी बुलेट घेऊन दिली.

मग किर्ती या बुलेटवरून कॉलेजमध्ये ये-जा करू लागली. याच काळात किर्ती आणि अविनाशमध्ये प्रेम बहरलं. हे प्रेमप्रकरण सुमारे दोन ते अडीच वर्षे सुरू होतं.

पुढे किर्ती आणि अविनाश यांच्यातील नात्याबद्दल किर्तीच्या घरातल्यांना कळलं. त्यांनी किर्तीचं कॉलेजात येणं जाणंच बंद करून टाकलं.

दोघांनी मग पुढचा निर्णय घेतला, तो म्हणजे पळून जाण्याचा. काही दिवसांनी किशोरी आणि अविनाश 21 जून 2021 रोजी पळून गेले.

तिथून त्यांनी पुण्याजवळचं आनंदी गाव गाठलं आणि लग्न केलं. लग्न केल्यानंतर एका महिन्याने दोघेही गावी परतले.

अविनाशकडे चार एकर शेती आहे. या शेतात दोघंही काम करत होते आणि आपला चरितार्थ चालवत होते. मायबापांनी पाठ फिरवली असली, तरी किर्तीच्या आयुष्यात सगळं काही मनासारखं सुरू झालं होतं. पण, तिचं हे सुख तिच्याच आई आणि भावाला बघवलं नाही.

काही महिने लोटल्यानंतर किर्तीची आई अचानक तिच्या घरी आली. त्यामुळे आता सगळं वैर संपलं असंच किर्ती आणि तिच्या सासरकडच्या मंडळींना वाटलं.

आठवडाभराने पुन्हा किर्तीची आई तिच्या लहान भावासह भेटायला आले. पण, आपली आई आणि भाऊ शेवट करण्यासाठी आल्याची तिला जाणीवही झाली नाही. सैराटमधील आर्चीसारखीच किर्तीही आई आणि भावासाठी चहा करायला किचनमध्ये गेली पण परत बाहेर आली नाही. आलं ते तिचं फक्त शिर!

किर्तीचं शिर दाखवत भावाने क्रूर गेलेल्या तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेचा सुड घेतल्याचं ओरडून सांगितलं, पण किर्तीच्या हत्येनं दोघांच्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला अ्न एका राजा आणि राणीची कहाणी अधुरीच राहिली…

    follow whatsapp